करमाळा प्रतिनिधी
“देशाच्या आर्थिक विकासात समाजातील प्रत्येक घटकाचा वाटा असायला हवा. त्यासाठी उत्पन्नाची साधने गाव-खेड्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीला गती देण्यासाठी ‘आयआयटी’ सारख्या उच्च संस्थांइतकेच तळागाळातील कुशल मनुष्यबळ घडवणाऱ्या ‘आयटीआय’ संस्थाही सक्षम झाल्या पाहिजेत. त्यांच्यात आधुनिक काळानुसार बदलही झाला पाहिजे,” असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी व्यक्त केले.

करमाळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आयटीआय) ‘स्व. मदनदास देवी औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असा नामांतर सोहळा मंगळवारी (३० जून) अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे मुख्य वक्ते म्हणून आंबेकर बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या, तर राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

स्व. मदनदास देवी यांच्या प्रदीर्घ राष्ट्रकार्याचा गौरव करताना सुनील आंबेकर म्हणाले, “मदनदास देवी हे संघाच्या मुशीत घडलेले सार्वजनिक जीवनातील एक आदर्श आणि उत्तम कार्यकर्ते होते. स्वतः पडद्याच्या मागे राहून संघटना आणि राष्ट्रकार्य कसे पुढे नेता येईल, हे त्यांचे जीवनव्रत होते; जे त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत निष्ठेने पाळले. देशाच्या खऱ्या प्रगतीसाठी तरुणांना योग्य दिशा मिळणे आवश्यक आहे, या विश्वासातून त्यांनी देशभर विद्यार्थ्यांची एक मोठी रचनात्मक चळवळ उभी केली. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या जागतिक पटलावर वावरताना भारताचे हित कसे जपले पाहिजे, हा स्वदेशीचा विचार त्यांनी तरुण पिढीत रुजवला.”

पुढे बोलताना आंबेकर यांनी शहरीकरणाच्या वाढत्या समस्यांवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “केवळ शहरे मोठी करून देश समृद्ध होणार नाही. आर्थिक उत्पन्नाची साधने खेड्यांपर्यंत पोहोचवून ग्रामीण भागात उद्योगांचे मोठे जाळे तयार करावे लागेल. आज जगातील अनेक विकसित देशांमध्ये प्रचंड आर्थिक सुबत्ता असली, तरी मानवी सुखात आणि कौटुंबिक व्यवस्थेत बाधा आली आहे. त्यामुळे भारताला प्रगती करताना केवळ तंत्रज्ञानाचा विचार करून चालणार नाही, तर तंत्रज्ञानासोबत ‘माणूस आणि चरित्र्य निर्माणाचे’ कार्य करावे लागेल. मदनदास देवींनी त्यांच्या जीवनकाळात देशात अनेक सक्षम मुख्यमंत्री, सनदी अधिकारी, डॉक्टर आणि समाजसेवक घडवले. हिंदू समाजाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण, जनजाती आणि मागास घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक कार्य केले. तसेच ईशान्य भारताच्या (पूर्वांचल) एकात्मतेसाठी गुवाहाटी येथे ‘युवा विकास केंद्र’ उभे केले.”

बदलत्या काळाची पावले ओळखून आयटीआय सारख्या संस्थांमध्येही सुधारणा व्हाव्यात, याच दूरदृष्टीतून मदनदास देवींनी १९८९-९० मध्ये नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) माध्यमातून ऐतिहासिक ‘आयटीआय राष्ट्रीय संमेलन’ भरविले होते, याची आठवण करून देत आंबेकर यांनी करमाळा आयटीआयच्या नामांतरामुळे त्यांच्या या ध्येयधोरणांची सार्थकता अधोरेखित झाल्याचे सांगितले.

  • विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता रुजवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शुभसंदेशात स्व. मदनदास देवींच्या स्मृतींना अभिवादन करत आयटीआयच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. मुख्यमंत्री म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्र निर्मितीची चळवळ आणि राष्ट्रीय एकात्मतेचे ध्येय रुजवण्यात मदनदास देवींचे कार्य अतुलनीय होते. विशेषतः ईशान्येकडील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आयुष्यभर भगीरथ प्रयत्न केले. आजच्या युगात आयटीआय हे केवळ तांत्रिक कौशल्य शिकवणारे केंद्र राहिलेले नसून ते देशासाठी कुशल, सक्षम आणि राष्ट्राभिमानी मनुष्यबळ निर्माण करणारे ऊर्जाकेंद्र आहे. विकसित भारताच्या संकल्पनेत या संस्थांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.”
  • करमाळा आयटीआयमध्ये ‘टाटा इन्स्टिट्यूट’ची शाखा: मंत्री मंगलप्रभात लोढा
    कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मदनदास देवींच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या वतीने सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. लोढा म्हणाले, “मदनदास देवींनी भारताचा आर्थिक विकास (जीडीपी) वाढवण्यासाठी आणि तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेतली. त्यांच्या याच विचारांना पुढे नेत राज्य सरकार राज्यातील आयटीआय संस्थांचे मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण करत असून, त्यासाठी ५ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे.”

विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्यासोबतच स्वतःचे ‘स्टार्टअप’ उभे करण्यासाठी सक्षम केले जात असल्याचे सांगत मंत्री लोढा यांनी माहिती दिली की, आयटीआयमध्ये आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इलेक्ट्रिकल कोर्सेससारखे आधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून, पुढील वर्षात आणखी पाच नवे प्रगत कोर्सेस सुरू केले जातील.

यावेळी करमाळा परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा करताना मंत्री लोढा म्हणाले की, या भागातील कौशल्य विकासाला अधिक चालना देण्यासाठी करमाळा आयटीआयमध्ये ‘टाटा इन्स्टिट्यूट’ची एक स्वतंत्र शाखा लवकरच सुरू करण्यात येईल. तसेच स्थानिक औद्योगिक गरजा ओळखून संस्थेने अल्पमुदतीचे व्यावसायिक कोर्सेस अधिक प्रमाणात सुरू करावेत, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.
यावेळी आमदार नारायण पाटील, माजी आमदार राम सातपुते, नगराध्यक्ष मोहिनीताई सावंत, भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, मदनदास देवी यांचे बंधू खुशालदास देवी, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालकाचे सतीश सूर्यवंशी संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र राठी, राधेश्याम देवी आदीजण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशिक्षण अधिकारी मनोज बिडकर, यांनी केले तर आभार व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सुर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव देशपांडे यांनी केले. यावेळी प्राचार्य शिक्षक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *