‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; माजी सैनिकांचा सन्मान, राष्ट्रप्रेमाचा जागर

करमाळा प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत केम येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात तिरंगा घेऊन नागरिक, विद्यार्थी, विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘जय हिंद’ अशा देशभक्तीपर घोषणांनी केमचा परिसर दुमदुमून गेला.

या रॅलीमध्ये भाजपा नेते दिग्विजय भैय्या बागल, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे, करमाळा ग्रामीण अध्यक्ष सचिन पिसाळ, महेश तळेकर, महावीर तळेकर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष शुभम बंडगर, रामभाऊ ढाणे, केम शहराध्यक्ष विकास कळसाईत, केमचे सरपंच राहुल कोरे, रंगनाथ शिंदे, धनंजय ताकमोगे, रघुनाथ सावंत, रेवननाथ फरतडे, विजयसिंह ओहोळ, गणेश तळेकर, त्रिंबक देवकर, बापू नेते, रामभाऊ राऊत, बापू कुर्डे, राहुल देव, रामभाऊ तळेकर, मनोज सोलापुरे, बाळासाहेब देवकर, आनंद शिंदे, पाथरुडीचे सरपंच सदाशिव तोडेकर, भारत नागणे यांच्यासह करमाळा तालुक्यातील नागरिक, शालेय विद्यार्थी व विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रॅलीदरम्यान देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांना आणि स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले. देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या माजी सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये मेजर नागनाथ गुंजाळ, मेजर रघुनाथ तळेकर यांच्यासह इतर माजी सैनिकांचा गौरव करण्यात आला.
राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे, देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवणे आणि प्रत्येकाच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना सदैव जागृत ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नसून तो भारताच्या स्वाभिमानाचे, त्यागाचे, एकतेचे आणि अखंडतेचे प्रतीक आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखत देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असा संदेश या रॅलीतून देण्यात आला.
‘हर घर तिरंगा’ अभियानामुळे केम परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला. रॅलीच्या निमित्ताने स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.