करमाळा प्रतिनिधी
आवश्यकता आहे उजनी धरणातील पाणी नियोजनाची….!
ऊजनी धरणात आज १०३.१२% (११८.९०TMC) पाणी असुन उद्यापासून धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात होणार आहे. परंतु आता प्रशासनाने उजनी धरणातील पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केले पाहिजे. उजनी धरण व्यवस्थापन, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे, विभागीय आयुक्त पुणे, जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य, सन्माननीय लोकप्रतिनिधी यांच्यात योग्य प्रकारे समन्वय साधून पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
आजपर्यंतचा इतिहास पाहता उजनी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने अल्पावधीतच धरण मायनसमध्ये जात आहे. सन २०२३-२०२४ या वर्षांत उजनी धरण -६१% पर्यंत रिकामे झाले होते त्यामुळे उजनी धरणात प्रचंड प्रमाणात गाळ असल्याचे दिसून आले हा गाळ व गाळमिश्रीत वाळू ११५२ लाख ब्रास असल्याचा अंदाज आहे. उजनी बॅकवॉटर काठच्या लोकांनी आपल्या जमीनी धरण प्रकल्पासाठी दिल्या आहेत त्या आमच्या धरणग्रस्त शेतकरी बांधवांवर उन्हाळ्यात पाणी मायनस मध्ये गेले म्हणून वीज कमी करून अन्याय केला जातो त्या माझ्या शेतकरी बांधवांना पाणी उचलता येत नाही.
उजनी धरणातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सर्वच लोकांचा हक्क आहे. सर्वांनाच पाणी मिळायला पाहिजे यात दुमत नाही परंतु आजपर्यंतचा इतिहास पाहता फक्त कागदावर पाणी नियोजन करुन जाणीवपूर्वक त्याची अंमलबजावणी करत नसल्याने लवकरच उजनी धरण मायनसमध्ये जात आहे. त्यामुळे उन्हाळ्यात उजनी धरण बॅकवॉटर परिसरातील शेतकरी बांधवांची वीज कमी केली जाते. त्या शेतकरी बांधवांवर उन्हाळ्यात उभी पिके लाईट नसल्याने समोर पाणी असूनही उचलता येत नाहीत व पिके धोक्यात येतात ही स्थिती निर्माण होते. ह्या परिस्थितीत बदल करण्यासाठी काटेकोरपणे पाणी नियोजन करणे आवश्यक आहे.
_श्री धुळाभाऊ कोकरे
चेअरमन लोकनेते नारायण आबा पाटील सह पतसंस्था जेऊर