
श्री. मकाई कारखान्याचे शेतकऱ्यांचे थकीत ऊस बीलाची रक्कम मिळावी अन्यथा 26 जानेवारी रोजी सामूहिक आत्मदहनाचा इशारा :- ॲड. राहुल सावंत
करमाळा प्रतिनिधी
शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत निर्धार
शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिलाची रक्कम 25 जानेवारी पर्यंत देऊ मा. जिल्हाधिकारी यांचे आश्वासन
करमाळा श्री. मकाई सहकारी साखर कारखान्याच्या मागील हंगामातील थकीत ऊस बिलासाठी बोंबाबोंब आंदोलन व थू थू आंदोलन, भजनी मंडळ, बैलं, कोंबड्या, गाढवं आणत ठिय्या आंदोलन तहसील कार्यालया समोर झाल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 25 डिसेंबर 2023 पर्यंत थकीत ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करू असे

आश्वासन दिले होते. परंतु ऊस बील अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा झाले नाहीत. त्यामुळे शासकीय विश्रामगृहात दि. 16/1/2024 रोजी ॲड. राहुल सावंत, शेतकरी कामगार संघटना अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे, दत्तकला शिक्षण संस्था अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र गोडगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. तर या बैठकीत दि. 25 जानेवारी पर्यंत ऊस बील न मिळाल्यास 26 जानेवारी 2024 रोजी करमाळा तहसील कार्यालया समोर सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा ॲड. राहुल सावंत निमंत्रित सदस्य – जिल्हा नियोजन मंडळ समिती सोलापूर यांनी दिला आहे.

पुढे बोलताना ॲड . राहुल सावंत म्हणाले की, शेतकऱ्यांना थकीत ऊस बील 15 % व्याजासहित मिळावे किंवा तत्कालीन व विद्यमान चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांच्या वर जीवनावश्यक वस्तू अधिनियम, केंद्रीय ऊस नियंत्रण आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावा आणि त्यांच्या खाजगी मालमत्ता वर बोजा चढवण्यात यावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 3/1/2024 रोजी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, प्रादेशिक

सहसंचालक पांडुरंग साठे, तहसीलदार शिल्पा ठोकडे, नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे, लेखापरीक्षक भोसले, आंदोलन कर्ते, तत्कालीन व विद्यमान चेअरमन, कार्यकारी संचालक यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठकीत शेतकरी यांचे शिष्टमंडळ यांना जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद यांनी 25 जानेवारी 2024 पर्यंत शेतकऱ्यांना थकीत ऊस बीलाची रक्कम देऊ असे आश्वासन दिले आहे.
बोलताना दशरथ आण्णा कांबळे म्हणाले की, मकाई सहकारी साखर कारखान्याचे थकीत ऊस बिलासाठी वारंवार करमाळा येथे आंदोलन झाले. कारखाना आणि प्रशासन यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची व सभासदांची आर्थिक फसवणूक व विश्वासघात केलेला आहे. चौदा महिने होऊनही अद्यापपर्यंत थकीत ऊस बीलाची रक्कम दिलेली नाही. वारंवार मागणी करूनही, आंदोलन होत असतानाही त्याचे गांभीर्य घेत नसल्यामुळे आंदोलन कर्ते शेतकरी आक्रमक झालेले दिसून येत आहेत .
तसेच थकीत ऊस बिलाची रक्कम पंधरा टक्के व्याजासहित मिळावी किंवा जोपर्यंत कारखान्याचे तत्कालीन व विद्यमान चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांच्या खाजगी प्राॅपटी वर बोजाची नोंद करण्यात यावी व फौजदारी गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आमचा हा लढा चालूच राहणार आहे. अशी भूमिका आंदोलनकर्त्यांच्या वतीने घेण्यात आली.
बोलताना रामदास झोळ म्हणाले की, सन 2022 – 2023 गाळप हंगामातील 159335 मे. टन साखर पोती विक्री, बगॅस, मोलॅशीस, आदी उपपदार्थ ची विक्री करताना सक्षम अधिकारी यांची परवानगी घेतली होती काय ? आणि याची टेंडर प्रक्रिया केली होती काय ? या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी आणि जबाबदारी निश्चित करून कारखाना व चेअरमन, संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक यांच्या खाजगी प्राॅपटी वर बोजाची नोंद करण्यात यावी आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
बोलताना रवींद्र गोडगे म्हणाले की, दि. 25 जानेवारी 2024 पर्यंत मा. जिल्हाधिकारी यांच्या शब्दाला मान देऊन थांबू मात्र या अवधीत थकीत ऊस बीलाची रक्कम न मिळाल्यास 26 जानेवारी 2024 रोजी सामूहिक आत्मदहन करणार आहे. जोपर्यंत आमच्या हक्काचे ऊस बील मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही.
यामुळे दि. 16/1/2024 रोजी शासकीय विश्रामगृह येथे शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी शहाजी माने, गणेश वाळूंजकर, रवींद्र गोडगे, ॲड. राहुल सावंत, दशरथ आण्णा कांबळे, प्रा. रामदास झोळ सर यांनी मनोगत व्यक्त केले आणि दि. 26 जानेवारी रोजी सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्याचे स्वतंत्र निवेदन देण्यासाठी हरिदास मोरे, मोहन पडवळे, माऊली कावळे, काकासाहेब गपाट, अविनाश पाटील, गणेश वाळुंजकर, सुंदरदास काळे, पंढरीनाथ पाटील, संतोष मोरे, दादा जाधव, प्रकाश पवार, राजेंद्र पाटील, शहाजी माने, दादा साबळे , नितीन सरडे, कांतीलाल पाटील, आबा सरडे, नामदेव सरडे, उमेश सरडे, प्रशांत पोळके, माधव दादा नलवडे , विठ्ठल शिंदे, दौलत वाघमोडे, आजिनाथ भागडे, अरविंद निलंगे, भालचंद्र इवरे, नंदू इरकर, जालिंदर टोणपे, विकास मुरूमकर, राजेश गायकवाड, सिध्देश्वर नलवडे, बाळासाहेब रोडे, विलास पाटील, पंडीत जाधव , युवराज रोडे, पंढरीनाथ शेवाळे असे अंदाजे आज 200 शेतकरी उपस्थित होते आणि त्यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांना स्वतंत्र 200 निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , सहकार मंत्री,महसूल मंत्री , विरोधी पक्ष नेते, अतिरिक्त मुख्य सचिव सहकार व मार्केटिंग, विभागीय आयुक्त, साखर आयुक्त, सहकार आयुक्त, महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रादेशिक सहसंचालक सोलापूर , तहसीलदार , पोलीस निरीक्षक , तत्कालीन व विद्यमान चेअरमन श्री. मकाई कारखाना, कार्यकारी संचालक श्री मकाई कारखाना यांना देण्यात आले