‘हर हर महादेव’च्या जयघोषात भक्तिमय सांगता

करमाळा प्रतिनिधी

अधिक मासानिमित्त करमाळा येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य शिवमहापुराण कथेची गुरुवारी अत्यंत भक्तिमय वातावरणात सांगता झाली. सात दिवस चाललेल्या या धार्मिक महोत्सवाने संपूर्ण करमाळा नगरी अक्षरशः शिवमय झाली होती. “हर हर महादेव”च्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेला असून हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

१५ मे ते २१ मे दरम्यान पार पडलेल्या या शिवमहापुराण कथेचे निरूपण ह.भ.प. स्नेहगंगाश्री आळंदीकर माई यांनी आपल्या प्रभावी आणि ओजस्वी वाणीतून केले. भगवान शिवशंकरांच्या भक्तीचे महत्त्व, बारा ज्योतिर्लिंगांचे आध्यात्मिक सामर्थ्य तसेच अर्धनारीनटेश्वर रूपातील शिवशक्तीचे तत्त्वज्ञान त्यांनी अत्यंत भावपूर्ण शैलीत उलगडून सांगितले. “बारा ज्योतिर्लिंगांच्या केवळ स्मरणानेही पापांचा नाश होतो. शिवभक्ती ही मानवाच्या जीवनाला समाधान, शांती आणि कल्याण देणारी दिव्य शक्ती आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांच्या ओघवत्या निरूपणाने उपस्थित भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.

कथेदरम्यान भगवान शिवशंकर आणि देवीच्या अर्धनारीनटेश्वर रूपाचा आकर्षक सजीव देखावा सादर करण्यात आला. संत गजानन महाराजांच्या आराध्य दिनानिमित्त उभारण्यात आलेल्या भव्य देखाव्यांनी भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. “गण गण गणात बोते”च्या जयघोषात भाविक भक्तिभावाने नतमस्तक झाले. महिला भगिनींनी देवीसमोर पारंपरिक फुगड्या घालत आरती केली. “तुळजाभवानी माता की जय”, “जगदंबे की जय”, “सप्तशृंगी माते की जय” अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.

कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्यास माजी आमदार जयवंतराव जगताप, तहसीलदार शिल्पाताई ठोकडे, पोलीस निरीक्षक रणजीत माने, जामखेडच्या नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, नगरसेवक अमित चिंतामणी, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, नगरसेवक सचिन गायकवाड, जामखेडचे शिवसेना नेते आकाश बाफना यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी आयोजनाचे कौतुक करत आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी महाप्रसादाचे मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आले. स्वर्गीय डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील यांच्या स्मरणार्थ डॉ. रोहन पाटील यांनी परिवाराच्या वतीने अन्नदान केले. करमाळा शहर व तालुक्यातील हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मुख्य यजमान श्रेणिकशेठ खाटेर, संगीता खाटेर, ॲड. संकेत खाटेर, मोक्षा खाटेर व वर्धमान खाटेर यांनी परिवारासह महाआरती व ग्रंथपूजन करून कार्यक्रमाची सांगता केली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती, संत गजानन महाराज मंदिर समिती, भक्त परिवार तसेच एसटी कॉलनी महिला मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. याशिवाय श्रीमती रंजना कुरूलकर, नारायण पवार, कालिदास घोगरे, श्रीपाद आडकर, जगदीश शिगची, नवनाथ चौधरी, रवींद्र विद्वत, पत्रकार दिनेश मडके, हनुमानसिंग परदेशी, वैभव दोशी, प्रदीप देवी, नितेश देवी, आशिष बोरा, गणेश बोरा, नगरसेवक दीपक चव्हाण, महावीर फर्निचरचे सर्व स्टाफ, सुरेश आटोळे, गणेश महाडिक, राणी महाडिक, गिरीश शहा, ननवरे मामा, विजय बरीदे, अक्षय शिंदे, नागेश पवार आदींनीही मोलाचे सहकार्य केले.

या सात दिवसीय शिवमहापुराण कथेच्या निमित्ताने करमाळा शहरातील धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिक दृढ झाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली. भव्य-दिव्य स्वरूपात पार पडलेल्या या आयोजनाबद्दल सर्व स्तरांतून आयोजकांचे कौतुक होत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्योती मुथ्था मॅडम यांनी आपल्या भारदस्त शैलीत केले, तर आभार मुख्य यजमान श्रेणिकशेठ खाटेर यांनी मानले.

…………….

धार्मिक कार्यासाठी पूर्व पुण्याई लागते : माजी आमदार जयवंतराव जगताप

शिवमहापुराण कथेच्या सांगता सोहळ्यात माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आयोजकांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. श्रेणिकशेठ खाटेर, रंजना कुरूलकर, श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती तसेच संत गजानन महाराज भक्त परिवार यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी धार्मिक कार्यक्रम हे परमेश्वरी कार्य असल्याचे सांगितले. “ज्याच्या प्रारब्धात परमेश्वराने असे कार्य लिहून ठेवले आहे, तोच व्यक्ती हे कार्य यशस्वीपणे पार पाडू शकतो. त्यासाठी पूर्व पुण्याई आवश्यक असते. अशा धार्मिक कार्यामागे परमेश्वराची कृपाच असते,” असे मत त्यांनी व्यक्त केले. समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी अशा धार्मिक कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या जीवनाचे सार्थक करावे, असे आवाहनही यावेळी जयवंतराव जगताप यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *