
करमाळा प्रतिनिधी
पोधवडी ता.करमाळा येथील हुंबेवस्ती नजीकचा पाझर तलाव शंभर टक्के भरल्यानंतरही सांडव्यातून पाण्याचे विसर्जन योग्य प्रमाणात होत नव्हते. त्याच बरोबर तलावाच्या मध्यभागातील भरावाची उंची सुमारे दोन मीटरने कमी असल्यामुळे हा तलाव मोठ्या पावसात फुटू शकतो अशी अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. अशा अवस्थेत पोंधवडी व मांजरगांवतील शेतकऱ्यांनी या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रा.डॉ.संजय चौधरी यांना याची कल्पना दिली. त्यानंतर प्रा.चौधरी यांनी आमदार नारायण (आबा) पाटील यांचेशी प्रत्यक्ष संवाद साधला व परिस्थितीची माहिती दिली तसेच आमदार नारायण आबा पाटील यांच्या सुचनेनुसार प्रत्यक्ष तलावाला भेट देवून मंडळ अधिकाऱ्यांसह, तहसीलदार शिल्पा ठोकडे व

जलसंधारणचे अभियंता काळे यांना संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. तहसीलदार शिल्या ठोकडे मॅडम यांनी अतितातडीने यंत्रणा कामाला लावली. त्यानंतर दोन जेसीबीच्या माध्यमातून रातोरात धोकादायक स्थितीतील पाझर तलावाच्या सांडव्याची खोली वाढवून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे सद्यस्थितीत संभाव्य धोका टळला आहे. तसेच तलावाच्या खालील शेकडो एकर जमीन खरवडून जाण्यापासून वाचली आहे. यापूर्वीही सुमारे चाळीस वर्षापूर्वी अतिवृष्टीने हा पाझर तलाव फुटून शेकडो एकर शेती खरवडून गेली होती आणि शेकडो शेतकऱ्यांचे अपरिमित हानी झाली होती. तलावाचे मोठे पाणलोट क्षेत्र ,तलावाची खूप मोठी उंची आणि अतिवृष्टीचा देण्यात आलेला ईशारा यामुळे या परिसरातील शेतकरी घाबरून गेलेले होते. अशावेळी शेतकऱ्यांच्या हाकेला “ओ” देवून व अतितातडीने सांडव्याचे खोलीकरण करून घेण्याची कार्यवाही करून घेतल्याबद्दल प्रभाव क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आमदार नारायण (आबा) पाटील, तहसीलदार शिल्पा ठोकडे व प्रा.डॉ.संजय चौधरी व आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांचे आभार व्यक्त केले आहे.