करमाळा प्रतिनिधी
करमाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ. अमित कदम सातत्याने कार्यालयात अनुपस्थित असतात त्यांची खाते निहाय चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे नेते करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. कुलदीप जंगम यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. माजी आमदार जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे की, माझे करमाळा तालुक्यातील करमाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ.अमित कदम हे सातत्याने कार्यालयात अनुपस्थित असतात. कदम हे पंचायत समितीमध्ये रुजू झालेपासून सातत्याने अनुपस्थित राहत असल्यामुळे पंचायत समितीच्या कारभारात विस्कळीत पणा आला आहे. तालुक्यातील सर्व जनतेची कामे मोठ्या प्रमाणात रखडली आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांसाठी कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न पडला आहे. नागरिक पंचायत समितीच्या कार्यालयात गेले असता गटविकास अधिकारी मिटिंगला गेले आहेत, सुनावणी साठी गेले आहेत अशी मोघम स्वरुपाची उत्तरे दिली जातात. कदम हे कोणाचेही फोन घेत नाहीत त्यामुळे पंचायत समितीमध्ये येणारे सर्व सामान्य नागरिक व येथील लोकप्रतिनिधी देखील त्रस्त झालेले आहेत. दिव्यांग, वयोवृद्ध,दिन दलित, मागासवर्गीय नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत. पंचायत समितीच्या कार्यालयातून माहिती घेतली असता कदम हे त्यांचा स्वतःचा सातारा येथे वैद्यकीय व्यवसाय करीत असल्यामुळे सतत अनुपस्थित राहत असल्याची माहिती मिळाली. मध्यंतरी करमाळा येथे झालेल्या आमसभेत देखील याविषयी प्रश्न उपस्थित झाले होते. तरीदेखील कदम यांचे उपस्थितीवर त्याचा काही परिणाम झाला नाही. तरी कदम यांच्या सातत्याने अनुपस्थितीची खातेनिहाय सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.

तसेच करमाळा तालुक्यातील जनता त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित राहू नये, शासकीय योजनांचा योग्य वेळेत व विहित मुदतीत लाभ घेता यावा यासाठी पंचायत समितीच्या कामकाजात सुसूत्रता येणे आवश्यक आहे. यास्तव तालुक्यातील जनतेची होणारी अधिक परवड थांबविणेसाठी करमाळा पंचायत समितीमध्ये कार्यक्षम गटविकास अधिकाऱ्याची नियुक्तीचे आदेश व्हावेत अशी मागणी देखील माजी आमदार जगताप यांनी निवेदनाद्वारे केली आहे.याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुलदीप जंगम यांच्याशी आपले भ्रमणध्वनीवरून बोलणे झाले असून त्यांनी याबाबत उचित कार्यवाही करतो असे सांगितले आहे अशी माहिती माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी दिली.