करमाळा प्रतिनिधी

करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांना रब्बी आवर्तना द्वारे शेतीसाठी उजनीतून पाण्याची पाळी देण्यात यावी अशी मागणी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी केली आहे. यासाठी त्यांनी कार्यकारी संचालक (कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे ) यांना निवेदन दिले आहे. या बाबत अधिक माहिती देताना आमदार नारायण (आबा) पाटील म्हणाले कि उजनी धरणातून करमाळा मतदार संघातील दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी 1.80 टी एम सी इतका पाणी साठा राखीव आहे तर भीमा सीना जोडकालवा अर्थात बोगद्यासाठी 3.50 टी एम सी एवढा पाणी साठा राखीव ठेवण्यात आला आहे. तर सीना कोळगाव धरणातून सीना कोळगाव उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करणे गरजेचे आहे. तसेच मतदार संघातील सर्वात मोठा तलाव म्हणून गणल्या गेलेल्या मांगी तलाव ( 890 एम सी एफ टी ) यातूनही आवर्तन देणे गरजेचे आहे. यातील दहिगाव उपसा सिंचन योजना व सीना भीमा जोडकालवा यामधून रब्बी आवर्तन देण्यासाठी संबंधित विभागास तातडीने आदेश दिले जावेत. सध्या या योजनेवर आधारित कृषी क्षेत्रात केळी, ऊस यासारखी नागदि पिके तर गहू, ज्वारी, हरभरा, मका, कांदा आदी पिके उभी आहेत यासाठी रब्बी आवर्तन देऊन या पिकांची जोपासना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी आपल्याकडे शेतीसाठी पाण्याची मागणी केली असून या सर्व योजनाच्या लाभ क्षेत्रातील पीक उत्पादन वाढण्यासाठी रब्बी आवर्तन देणे गरजेचे आहे.तरी आपण या विभागातील जिल्हा तसेच तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांना रब्बी आवर्तन देण्याची सूचना करावी अशी मागणी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्य अभियंता जलसंपदा विभाग पुणे, अधीक्षक अभियंता लाभ क्षेत्र प्राधिकरण सोलापूर, अधीक्षक अभियंता धाराशिव पाटबंधारे विभाग व कार्यकारी अभियंता सीना कोळगाव प्रकल्प विभाग (परांडा) यांना पाठविण्यात आल्याची माहिती करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवांनंद बागल यांनी दिली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *