
करमाळा प्रतिनिधी
मौजे कोर्टी येथे दि. १५/९/२५ रोजी झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे मौजे गोरेवाडी येथील वनविभागाच्या क्षेत्रात असलेला जुना पाझर तलाव पहिल्यांदा तुडुंब भरला होता. सांडव्याची बाजू कठीण खडकांची असल्याने अतिरिक्त पाणी पाहिजे त्या प्रमाणात बाहेर पडत नव्हते. त्यामुळे पाझर तलावातील पाण्याची पातळी वाढून भरावाच्या खाली १-२ फूटापर्यंत आली होती. लहान मोठी झाडे झुडुपे भराव्यावर असल्याने पायवाट देखील बंद होती. झाडांच्या लहान मोठ्या मुळ्यांमुळे भराव्यावर आणि मध्यभागी भेगा पडून पाणी पाझरत होते. सध्याच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजून जर मोठा पाऊस पडला तर पाझर तलाव फुटेल की काय ही भिती होती. त्यात वनविभागाचे नियम कडक असल्याने तलावाची दुरुस्ती आणि अतिरिक्त पाणी बाहेर कसे काढायचे असा प्रश्न होता.

सुदैवाने दि. २४/९/२५ रोजी अजित दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा पाहणी दौरा कोर्टी येथे होता. त्यांना या दिवशी या बाबत सविस्तर निवेदन देऊन कैफियत मांडली. दादांनी निवेदन वाचून याचे गांभीर्य ओळखून वनखाते आणि पाटबंधारे विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या. करमाळ्याच्या तहसीलदार ठोकडे मॅडम यांनी यांनी स्वतः लक्ष घालून संबंधित यंत्रणेला सुचना दिल्या. त्याच दिवशी दुपारी १ वा. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कटर मशीन, जेसिबी बोलावला. कटर मशीनने बुंध्यालगत लहान मोठी झाडे झुडुपे कापली आणि आवश्यक त्या ठिकाणी जेसीबी च्या सहाय्याने भराव्यावर आणि ज्याठिकाणी भेघा पडून पाझरत होते त्या ठिकाणी पक्का मुरुम टाकून चोपून घेतले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुन्हा जर पाऊस पडला तर दक्षता म्हणून आहे त्या पाणी साठ्याला धक्का न लावता अतिरिक्त सांडवा काढून ठेवला. ही सर्व कामे किशोर येळे सहायक वनसंरक्षक पुणे, किशोर होशिंग उपवनसंरक्षक पुणे, उप अभियंता गिरी लघुपाटबंधारे विभाग करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली केली. ही कामे चालू असताना पाझर तलावाच्या भराव्याला धक्का लागू न देता, रोहिणी साळुंखे वनपरिक्षेत्र अधिकारी, गोपाळ दोंड वनपरीमंडळ अधिकारी, वनरक्षक माधुरी जाधव करमाळा यांनी खूप परिश्रम घेतले.
हे काम मार्गी लावण्यासाठी निवेदन तयार करणे, नागरिकांना अवगत करणे, उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन या कामाचे गांभीर्य लक्षात आणून देणे आणि काम चालू असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे यामध्ये निलकंठ अभंग सेवा निवृत्त कृषी अधिकारी, सुभाष अभंग उपसरपंच, बाळासाहेब पारखे, ग्रामविकास अधिकारी कुदळे, आप्पा गोरे, प्रकाश पारखे, सयाजी जाधव, बजरंग शिंदे पोलिस पाटील, सुभाष पारखे, संतोष पारखे, प्रतिक जाधव, रंगनाथ अनारसे, अभिषेक शिंदे व ग्रामस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याबद्दल बहुतांश नागरिकांनी समाधान व्यक्त केले.