
करमाळा प्रतिनिधी
गतवर्षी 2024 च्या फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पावसामुळे वादळी वाऱ्यामुळे करमाळा तालुक्यातील केळी कांदा कलिंगड अशा नगदी पिकांची नुकसान झाले होते. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंचनामे करण्याचे आदेश देऊन मार्च 2025 मध्ये करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुमारे साडेनऊ कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली होती. त्यामध्ये उमरड, सोगाव पूर्व, सोगाव पश्चिम, सोगाव, पारेवाडी, गुळसडी, देवळाली, कुंभेज, वांगी, चिकलठाण या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत मिळाली होती.

त्याचप्रमाणे यावर्षीचा प्रचंड अवकाळी पावसामुळे केळी कांदा कलिंगड खरबूज भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसान ग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून एकरी एक लाख रुपये प्रमाणे आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली आहे. अजून पंचनामे करण्याचे आदेश निघालेली नाहीत.

इंदापूर, भिगवन, माळशिरस या भागात पंचनामे सुरू झाले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत मात्र अद्याप सोलापूर जिल्ह्यात तालुकास्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश मिळालेली नाहीत याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाही व्हाट्सअप वर निवेदन पाठवण्यात आले आहे.
याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनाही निवेदन देण्यात आले असून तात्काळ पंचनामेचे आदेश न झाल्यास शिवसेना सत्तेत असताना सुद्धा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा शिवसेनेच्या वतीने उपतालुका प्रमुख डॉ. गौतम रोडे, बाळासाहेब वाघ, शहर प्रमुख संजय शीलवंत, युवा सेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत राखुंडे, माजी तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, तालुकाप्रमुख अनिल पाटील, उपतालुकाप्रमुख तथा छत्रपती दूध संघाचे चेअरमन अजिंक्य पाटील, नागेश शेंडगे, आदी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
……………..
माझ्या शेतात दोन एकर कलिंगड असून पीक काढणीला आहे. एक कलिंगड चार किलो पर्यंत वजनाचे झाले आहे. किमान तीन ते चार लाख रुपये यातून उत्पन्न मिळणार होते मात्र पूर्ण शेतात पाणी गेल्यामुळे आता हे कलिंगड पीक नसणार आहे – राजेंद्र मेरगळ (कलिंगड उत्पादक शेतकरी)
………………
करमाळा तालुक्यात सर्वत्र गावरान कांद्याचे पीक हार्वेस्टिंग ला आली असून अनेक शेतकऱ्यांची कांदा काढण्याची प्रक्रिया चालू होती मात्र या प्रचंड पावसामुळे हजारो टन कांदा शेतातच कुजला आहे – सुजित बागल (कांदा उत्पादक शेतकरी)
…………….
वादळी वारे व पावसामुळे नवीन लागवड केलेली पाण्यातच कुजणार आहे. मोठी झालेली केळी वाकून तुटून पडत आहे. 15 मे पर्यंत पाणी नसल्यामुळे केळी जळत होती आता अतिवृष्टीमुळे कोलमडून पडले आहे – अतुल मस्कर (केळी उत्पादक शेतकरी)