करमाळा प्रतिनिधी

गेल्या आठवड्याभरापासून सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्याचा फटका थेट शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पिकांवर बसला आहे. कांदा, डाळिंब, द्राक्ष, केळी अशा नाशवंत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र शासन आणि प्रशासन अद्यापही मूग गिळून गप्प आहे. झालेल्या नुकसानीवर व अवकाळी वर बोलायला अद्यापही तयार नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून जिल्ह्यातील बाधित शेतीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशा आशयाचे निवेदन जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील व शेतकऱ्यांनी दिले असून पंचनामे व नुकसान भरपाई संदर्भात शासन आणि प्रशासनाकडून कोणताच अध्यादेश न आल्यास २ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, मानसून पूर्व पावसाने यंदा चांगलीच हजेरी लावली आहे. बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे. यामुळे शेतातील पिके मातीमोल झाली आहेत. एकीकडे कारखानदाराने शेतकऱ्यांच्या उसाचे पिले अद्याप दिली नाहीत. पैसा नसतानाही शेतकऱ्यांनी आर्थिक संकटाला तोंड देऊन पिकांची लागवड केली. मात्र आर्थिक डबघाईला आलेल्या शेतकऱ्याला निसर्गाने देखील झोपडले असून सुलतानी आणि पठाणी संकटांमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना मायबाप शासनाने आधार दिला पाहिजे. मात्र आठ दिवसापासून शासन आणि प्रशासन या विषयावर मूग गिळून गप्प आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचे दुःख शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरत असून याबाबतीत लवकर अध्यादेश न निघाल्यास २ जून रोजी हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा व ठिय्या आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर करणार असल्याचा इशारा अतुल खूपसे-पाटील यांनी दिला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *