
करमाळा प्रतिनिधी
तालुक्यातील तब्बल २३५०० हेक्टर इतक्या क्षेत्रावर उडीदाची लागवड असून यावर्षी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रमी आवक होण्याची लक्षणे आहेत. सध्या उडीदास सरासरी साडेआठ हजार रुपये इतका भाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात देखील समाधान व्यक्त केले जात आहे. उडीदास किमान ७५०० ते कमाल ८७०० व सरासरी ८५०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. करमाळा तालुक्यात उजनी, सीना – कोळगाव कुकडीच्या पाण्यामुळे बागायत क्षेत्राची वाढ झाली असून त्यामुळे ऊस, केळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असले तरी आदिनाथ, मकाई सह या तालुक्यातील सहकार क्षेत्राची झालेली दुर्दशा यामुळे यातून शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही लागत नाही असा पूर्वानुभव आहे. त्यामुळे हमखास चांगले उत्पन्न मिळवून देणारे भुसार पिकांमध्ये शेतकऱ्यांना विश्वास आहे. त्यामुळे करमाळा बाजार समितीमध्ये तूर, मका,ज्वारी, हरभरा सह उडदाची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. गतवर्षी दुष्काळी परिस्थिती असून देखील करमाळा बाजार समितीमध्ये ज्वारीची देखील मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती व सध्या देखील प्रति दिनी सरासरी तीनशे ते चारशे क्विंटल ज्वारीची आवक नियमितपणे सुरू आहे हे विशेष. सन २०२३ मध्ये ज्वारीची ३४००० क्विंटल आवक आली होती तर जानेवारी २०२४ पासून आत्तापर्यंत तब्बल ६५००० क्विंटल ज्वारीची आवक करमाळा मार्केट यार्ड मधे झाली आहे. ज्वारीला दर देखील चांगला मिळत आहे. ज्वारीला किमान २४०० पासून कमाल ४६०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. यावर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

…………………….
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसमोर उघड लिलाव, त्वरित मापे व २४ तासात शेतमाल विक्रीची पट्टी देण्याची व्यवस्था असल्यामुळे करमाळा तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील शेतकऱ्यांचा भुसार शेतमाल विक्रीसाठी करमाळा बाजार समितीला पसंती असते. गेली ७५ वर्षापासून करमाळा बाजार समितीचा विश्वसनीय बाजारपेठ म्हणून राज्यात सर्वत्र लौकिक आहे. शेतकरी, व्यापारी, खरेदीदार, हमाल-तोलार यांच्यात योग्य असा समन्वय असल्यामुळे याचा चांगला परिणाम पारदर्शी कामकाजावर होत आहे. यातून कोट्यावधी रुपयाची उलाढाल होवून याचा सकारात्मक आर्थिक परिणाम करमाळा बाजारपेठेवर होणार आहे, यामुळे येणारे गणेशोत्सव, दसरा, दिवाळी सारखे सण उत्साहात साजरे होतील – जयवंतराव जगताप, माजी आमदार तथा सभापती बाजार समिती करमाळा
…………………..
आवारा बाहेर शेतमाल खरेदीचे प्रकार काही फडी वाल्यांकडून होत असून या मधून शेतकऱ्यांच्या आर्थिक फसवणुकीचे काही प्रकार घडत असून मापात देखील शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे तरी शेतकऱ्यांनी संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी आपला शेतमाल बाजार समितीमध्येच विक्रीसाठी आणावा व शासनाकडून देखील अशा प्रकारांवर निर्बंध लादण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे – विठ्ठल क्षिरसागर, सचिव करमाळा बाजार समिती