
जेआरडी माझा
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू म्हणणाऱ्या कृषी मंत्र्यांची घोषणा खोटी ठरली. खरीप हंगामात पावसाने दडी मारल्यामुळे करमाळा तालुक्यावरती दुष्काळाचे सावट निर्माण झाले असताना देखील बळीराजांनी प्रधानमंत्री पिक विमा भरलेला आहे. त्यामध्ये उडीद तूर मूग कांदा बाजरी मका सोयाबीन या पिकांचे पावसामध्ये खंड पडल्यामुळे अतोनात नुकसान झाले. केंद्र व राज्य सरकार यांनी जाहीर केले की एक रुपयांमध्ये पिक विमा मिळणार म्हणून सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा भरला. विमा कंपन्यांनी पिक विमा देणार म्हणून घोषणा केली. महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घोषणा केली की, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू परंतु दिवाळी संपत आली तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत.

जगाचा पोशिंदा शेतकरी विम्याच्या पैशाच्या आशेवर होता परंतु खरीप हंगामातील विम्याचे पैसे खात्यावर जमा न झाल्यामुळे कृषी मंत्र्यांनी जी घोषणा केली होती ती हवेमध्येच विरळली. दिवाळी साठी विमा रक्कम न मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे.

जर 20 नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा न झाल्यास बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी दिला आहे.

यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी बनकर, भीमराव येडे, आजिनाथ इरकर, अनिल तेली, निलेश पडवळे, संपत गव्हाणे, देविदास तळेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल घुमरे, नवनाथ कोळेकर, दादा कोळेकर, तात्यासाहेब काळे, इ. पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात आला असून मायबाप सरकारने शेतकऱ्यांनी भरलेल्या पिक विम्याच्या रकमा कोणतीही निकष न लावता 20 नोव्हेंबर पर्यंत जमा करा अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू. त्यामुळे मायबाप सरकारने त्वरित पीक विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करावी अशी मागणी केली जात आहे.