दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी नेरले सालसे तलावात सोडावे – औदुंबरराजे

करमाळा प्रतिनिधी

करमाळ्यातील दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी नेरले सालसे तलावात सोडण्याची मागणी माजीसरपंच औदुंबरराजे यांनी केली आहे. करमाळा तालुक्यातील साडे ओढ्यावर नेरले सालसे रोडवर नेरले तलाव आहे. या तलावाच्या पाण्यावर वरकुटे,आळसुंदे,सालसे,नेरले या चार गावातील चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. तसेच घोटी येथून येणाऱ्या ओढ्यावर नेरले येथे तलाव आहे व नेरले वरकुटे गावात काही छोटे बंधारे आहेत. घोटी व साडे येथील ओढ्यातून पाणी सोडल्यास हे सर्व बंधारे व दोन्ही तलावात पाणी येऊ शकते. त्यामुळे वरकुटे, आळसुंदे, सालसे, नेरले, आवाटी, लोणी, तालुका

माढा या सहा गावातील पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न सुटणार आहे. तसेच या गावांमध्ये तलावाच्या पाण्यावर अनेक शेतकऱ्यांनी करोडो रुपये खर्च करून ऊस केळी फळबागाची लागवड केली आहे. पाऊस अत्यल्प असल्यामुळे दुष्काळी परिस्थितीत या पिकांना थोडाफार दिलासा मिळू शकतो. आम्ही पाण्याची मागणी केली की आम्हाला सांगितले जाते तुमचे तलाव दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्ये समाविष्ट नाहीत. परंतु वरकुटे,आळसुंदे,सालसे ही गावे दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्ये समाविष्ट आहेत आणि या तलावाच्या पाण्याचा वापर या तिन्ही गावाला होतो. उजनी प्रकल्पात करमाळा

तालुक्यातील अनेक गावे बुडीत झाले आहेत.त्यामुळे तालुक्यातील सर्व गावांना उजनीचे पाणी देणे बंधनकारक आहे. माजी आमदार नारायण पाटील यांनी येथून पाणी सोडले होते.त्याचप्रमाणे घोटी व साडे ओढ्यातून दोन्ही तलावासाठी पाणी सोडावे. अशी मागणी निवेदनाद्वारे मा.आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे केली आहे. पाणी न सोडल्यास याचे गंभीर परिणाम येत्या काळात लोकप्रतिनिधींना भोगावे लागतील. अशी माहिती नेरले तालुका करमाळा ग्रामपंचायत चे माजीसरपंच औदुंबरराजे भोसले यांनी केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *