पाटील गटाचे युवा नेते पृथ्वीराज पाटील यांचा सरपंच होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

करमाळा प्रतिनिधी

संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या माजी आमदार नारायण पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या जेऊर ग्रामपंचायतीचे सरपंच व पाच प्रभागातील १५ ग्रामपंचायत सदस्यांचे आरक्षण मंगळवारी जाहीर झाले आहे. येथील लवकरच निवडणूक जाहीर होईल, असे चिन्ह आहे. येथील सरपंचपद हे ओबीसी सर्वसाधारण आले असल्याने पाटील गटाचे युवा नेते पृथ्वीराज पाटील यांचा सरपंच होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

करमाळा तालुक्यात जेऊर हे सर्वात महत्वाची ग्रामपंचायत आहे. तालुक्याची राजधानी म्हणून या ग्रामपंचायतीला ओळखले जाते. या ग्रामपंचायतीवर पाटील गटाची एकहाती सत्ता आहे. आताही तेथे तुल्यबळ विरोधक नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत पाटील गट देतील तो विजयी होणार हे निश्चित आहे. माजी आमदार पाटील यांचे चिरंजीव पृथीवराज पाटील हे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत उतरतील अशी शक्यता आहे. मात्र या निवडणुकीचा लांबलेला कालावधी आणि कधी निवडणुका होतील, निश्चित नसल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत ते उतरतील, अशी शक्यता आहे. तशी चर्चा देखील सुरु झालेली आहे.

करमाळा तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायतची मुदत डिसेंबर 2022 ला संपली आहे. येथे सध्या प्रशासक नियुक्ती आहेत. येथील निवडणूकीसाठी प्रभाग रचना करण्यात आली आहे. तसेच आरक्षण ही जाहीर झालेले आहे. ही निवडणूक 5 प्रभागांमध्ये होणार असून 15 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या ग्रामपंचायतसाठी थेट मतदारातून सरपंच निवड होणार असून सरपंचपदासाठी ओबीसी आरक्षण जाहीर झालेले आहे.

प्रभागनिहाय आरक्षण : प्रभाग क्र. १ मध्ये तीन जागा असतील. यामध्ये एससी महिला, ओबीसी सर्वसाधारण व सर्वसाधारण. प्रभाग क्र. २ मध्ये ३ जागा असतील. यामध्ये एससी सर्वसाधारण, ओबीसी सर्वसाधारण व सर्वसाधारण. प्रभाग क्र. ३ मध्ये ३ जागा असतील. यामध्ये सर्वसाधारण, सर्वसाधारण महिलाच्या दोन जागा. प्रभाग क्र. ४ मध्ये ३ जागा असतील. यामध्ये सर्वसाधारण व सर्वसाधारण महिलाच्या दोन जागा. प्रभाग क्र. ५ मध्ये ३ जागा असतील. त्यात ओबीसी महिला, सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे. जागा १५ जागांसाठी हे आरक्षण जाहीर झाले असून यामध्ये सात पुरूष व आठ महिला असतील.

आबांची निर्णय अंतिम
दरम्यान ‘कमलाई नगरी’ न्यूज पोर्टलशी बोलताना पाटील गटाचे युवा नेते पृथ्वीराज पाटील म्हणाले, जेऊर ग्रामपंचायत लढवण्याबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. आमचे नेते आबा जे ठरवतील ते आम्हाला मान्य असेल. याबाबत आमची कोणतीही चर्चाही झालेली नाही.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *