
दिगंबरमामा बागल जयंती निमित्त कृषी महोत्सवाचे विलासराव घुमरेंच्या हस्ते पुजन
करमाळा प्रतिनिधी- राज्याचे माजी मंत्री दहिगाव उपसा सिंचन योजनेचे जनक हरितक्रांतीचे प्रणेते लोकनेते स्व. दिगंबरमामा बागल यांच्या 68 व्या जयंतीच्या निमित्ताने दिनांक 9 मार्च ते 13 मार्च 2023 रोजी संपन्न होणाऱ्या भव्य कृषी महोत्सवाच्या कार्याचा प्रारंभ विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर यांच्या शुभहस्ते आज यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात भूमिपूजन करून संपन्न करण्यात आला. या भूमिपूजन प्रसंगी राज्य सहकारी साखर संघाच्या संचालिका रश्मी दिदी बागल उपस्थित होत्या. प्रारंभी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले या कृषी प्रदर्शन साठी आवश्यक स्टॉल आणि मंडप उभारणी कामाची सुरुवात झाली. यावेळी मार्केट कमिटीचे व्हाईस चेअरमन चिंतामणी जगताप, आदिनाथचे चेअरमन धनंजय डोंगरे, प्राध्यापक कल्याणराव

सरडे सर, पत्रकार संघाचे अध्यक्ष व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य एल. बी. पाटील सर, तसेच यशवंत परिवारातील प्राध्यापिका नाईक मॅडम व प्राध्यापिका अनिता देशमुख या सात व्यक्तींच्या हस्ते प्रतिकात्मक रित्या पहिली कुदळ मारून विधिवत भूमिपूजन संपन्न झाले. या भूमिपूजन समारंभाचे पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न मंगेश देशपांडे व संकेत कुलकर्णी यांनी केले. प्रारंभी गणेश पूजा करण्यात आली नंतर भूमिपूजन करण्यात आले. यावेळी साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल यांनी कृषी प्रदर्शनाच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट करून कृषी प्रदर्शनामध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे विविध स्टाँल असणार आहेत. तर या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आठवणीतले मामा हे अभिनव दालन उभारले जाणार असून, यामध्ये लोकनेते स्व. मामांच्या दुर्मिळ व संस्मरणीय अशा छायाचित्रांचे प्रदर्शन

आयोजित केले आहे. यातून जुन्या आठवणींना व त्यांनी केलेल्या विकास कामांना उजाळा मिळणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम राजकारण विरहित असून स्व. मामांनी ज्याप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन तालुक्यांमध्ये अनेक विकास कामे केली. त्यांच्या कामाप्रती ही अभिनव अशी आदरांजली असेल. या कृषी महोत्सवाच्या सोबतच महिलांसाठी माहेर मेळावा 10 मार्च रोजी आयोजित केला असून यामध्ये हळदीकुंकू व खेळ पैठणीचा कार्यक्रम तर उद्घाटन समारंभ व शहीद जवानांच्या वारसांचा सन्मान सोहळा संपन्न होईल. तसेच हलगी व लेझीम स्पर्धा 11 मार्च रोजी आयोजित केली आहे. 12 मार्च रोजी ग्रुप डान्स स्पर्धा व विविध कला महोत्सव आयोजित केला असून 13 मार्च रोजी या भव्य कृषी महोत्सवाची शानदारपणे सांगता होणार आहे. यावेळी साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल यांचे स्वीय सहाय्यक शेखर जोगळेकर यांनी आभार मानून या कार्यक्रमासाठी अतिशय कमी वेळात निरोप देऊनही सर्व मान्यवर उपस्थित राहिल्याबद्दल व आदिनाथ, मकाई, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य, नगरसेवक, दूध संघ संचालक, गाव गाव कार्यकर्ते, पत्रकार बंधू, यशवंत परिवारातील सर्व सदस्य या सर्वांचे आभार मानून सोलापूर जिल्हाच नाही तर महाराष्ट्रामध्ये हे भव्य असे कृषी प्रदर्शन आपणा सर्वांच्या सहकार्याने निश्चित संपन्न होईल, यावेळी स्वर्गीय मामांच्या जयंतीच्या निमित्ताने एक अभिनव कार्यक्रम राबवावा अशी संकल्पना रश्मी दिदी बागल, युवा नेते दिग्विजय बागल व मार्गदर्शक विलासरावजी घुमरे सर, मार्केट कमिटीचे व्हाईस चेअरमन चिंतामणी दादा जगताप यांच्या चर्चेदरम्यान निश्चित करण्यात आले. या कृषी प्रदर्शनाला यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांचे जनतेचे शेतकऱ्यांचे कार्यकर्त्यांचे हितचिंतकांचे तालुक्यातील खते व बी-बियाणे विक्रेते, शेती अवजारांची विक्रेते या सर्वांनी या प्रदर्शनाचे स्वागत केले, असून सहकार्य लाभत आहे. हे कृषी प्रदर्शन सर्वांनाच आदर्श ठरेल व ते भव्य स्वरूपात असेल असा विश्वास व्यक्त केला.