
करमाळा प्रतिनिधी
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा आमदार नारायण आबा पाटील यांनी कारखान्याबद्दल जी परिस्थिती आहे ती रोखठोक सांगावी अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे सभासद शेतकरी आहे. तो कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. तो कारखाना चालला पाहिजे याच्यात राजकारण करणे योग्य नाही. ते शेतकऱ्याचे मंदिर आहे. त्याबद्दल सध्या काय परिस्थिती आहे ते आमदार पाटील यांनी सांगणे आवश्यक आहे. कारखाना विकला नाही पाहिजे. चालवायला दिला तरी चालेल परंतु याबाबत संभ्रम अवस्था शेतकऱ्यांची आहे. कारखाना कुठल्यातरी कंपनीला चालवायला दिले असल्याचे समजते. त्यामागे एक मोठा राजकीय पुढारी असल्याचेही समजते. याबाबत मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचेही चर्चा आहे. हे खरे आहे का खोटे आम्हाला माहित नाही. याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी चर्चा होत आहे. त्यामुळे विद्यमान सत्ताधारी मंडळींनी फक्त बोर्ड मिटिंग घेऊन कारखान्याची प्रोसेस करू नये. सर्व शेतकऱ्यांचीही सभा बोलवून योग्य तो निर्णय घ्यावा तसेच विविध बँकेचे कर्ज आहे. बारामती अँग्रोचे काय करणार, कारखाना तुम्ही विकणार आहे की चालवाय देणार कारखाना कर्मचारी वर्ग, वाहतूकदार यांच्या अडीअडचणी कशा सोडवल्या जातील त्याचीही माहिती देणे आवश्यक आहे. याबाबत आमदार नारायण पाटील यांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही तर कारखाना स्थळावर कारखाना कर्मचारी शेतकऱ्यांना घेऊन मोठे जन आंदोलन उभा करणार आहे अशी माहिती शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
