करमाळा प्रतिनिधी
आदिनाथ सह. साखर कारखान्याचे पूर्व इतिहासाची माहिती देत पाटील गटाचे प्रवक्ते कधी मा.आ. संजयमामा शिंदे यांना टार्गेट करतात तर कधी बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांना टार्गेट करतात. आता त्यांनी बागल गटावर टिका टिप्पणी करून टार्गेट केलं आहे. पाटील गटाचे प्रवक्ते तळेकर सर यांच्या कडुन होणाऱ्या आरोपांचे प्रत्युत्तर करीत खंडन करण्याचे काम मा.आ. संजयमामा शिंदे गटाचे प्रवक्ते व करमाळा पंचायत समितीचे उपसभापती नेहमी करतात.
पंचायत समितीमध्ये सध्या बागल गट व शिंदे गट एकत्र असुन, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जगताप गटाची व अर्ध्या पेक्षा अधिक मोहिते पाटील गटातील दिग्गजांची साथही शिंदे- बागल युतीला होती. सध्या आदिनाथ वरून पाटील गटाकडून बागल गटावर होणाऱ्या टिकेबाबत उपसभापती ॲड. अजित विघ्ने यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले की, खरे तर प्रवक्ते तळेकरांना रोज कोणावर तरी टिका टिप्पणी केल्याशिवाय करमत नाही. ते सत्तेवर आहेत.
आमदारकी आणि कारखानदारी या दोन्हीच्या माध्यमातुन जनतेला दिलेली आश्वासने त्यांनी पुर्ण करावीत. आदिनाथचा पुर्वीचा इतिहास मांडून आता काय उपयोग होणार नाही. तो सर्वांना माहीत आहे. आता शेतकरी सभासदांनी तुम्हाला जी सत्ता बहाल केली आहे त्यामुळे पुढील नियोजन कसे करायचे व आदिनाथ कारखान्याला गर्तेतुन बाहेर काढायचे दिलेले आश्वासन कसे पुर्ण करणार यावर भाष्य करावे, ऊगाच वायफळ चर्चा कशाला असे स्पष्ट शब्दात सुनावले आहे. एकमेकांवर टिका टिप्पणी करण्यापेक्षा करमाळा तालुक्याच्या विकासकामात भर घालण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी काम केलं पाहिजे.