
करमाळा प्रतिनिधी
सदगुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या पावन आशिर्वादाने रविवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी अमृत जल प्रकल्पांतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन च्या माध्यमातून करमाळा तालुक्या तील श्रीक्षेत्र संगोबा मंदिराचा अंतर्बाह्य परिसर तसेच सिना नदीचे पात्र अन् दशक्रिया विधी ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. श्रीक्षेत्र संगोबाची महाशिवरात्रीला मोठी यात्राही भरते. त्याची पूर्वतयारी म्हणून ही स्वच्छता जनतेला उपयोगी पडते. संत निरंकारी मिशनच्या वतीने संपूर्ण भारतात १६०० पेक्षा अधिक ठिकाणी एकाच वेळेस नदीपात्र किंवा पाण्याचे तलाव येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

सदगुरू बाबा हरदेवसिंह जी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या सत्प्रेरणेने सन 2023 पासून अमृत जल प्रोजेक्ट संत निरंकारी मिशन आणि भारत सरकारच्या संयुक्त विचार प्रणालीतून सर्व मानवोपयोगी हे देशव्यापी स्वच्छता अभियान नरसेवा नारायण पूजा या उक्ती प्रमाणे मोठ्या श्रद्धाभावाने राबवले जाते.

संत निरंकारी मिशनच्या वतीने प्रत्येक वर्षी संपूर्ण भारतात वृक्षारोपण अभियान, भव्य रक्तदान शिबीर, नैसर्गिक आपत्तीवेळी मदतकार्य स्वच्छता अभियान (बसस्थानक, रेल्वेस्थानक, सरकारी दवाखाने परिसर व नदी पात्र इ.) ह्या संपूर्ण मानवतेसाठी उपक्रम निष्काम भावनेने राबवले जातात.
श्रीक्षेत्र संगोबा मंदिराचा अंतर्बाह्य परिसर व सिना नदीचे पात्र स्वच्छ करण्यासाठी लहान बाल गोपाळासह करमाळा ‘जातेगाव, निलज, पोटेगाव, पांगरे, वांगी नं. ३, वांगी नं. 2, केडगाव निंभोरे, मलवडी, नेरले, उमरड, दहिगाव, रिटेवाडी, चिखलठाण, शेटफळ, वाशिंबे या ठिकाणाहून जवळपास २०० महिला व पुरुष यांनी सहभाग घेतला.
हे स्वच्छता अभियान राबविण्यासाठी संत निरंकारी मंडळाचे ब्रँचमुखी पोपट थोरात यांच्या मार्गदर्शना खाली सेवादल संचालक रमेश वारे, सहाय्यक संचालिक वैशाली सरडे, सेवादल शिक्षक भैरू वळेकर, समवेत सर्व महिला व पुरुष तसेच नारायण जाधव, मुकुंद साळूंके, डॉ. भाऊसो सरडे, प्रमोद कोंडलकर, इन्नूस शेख, बप्पा धडस, मोहन चोरमले, डॉ. बाबीर मारकड, धनंजय कांबळे, संजय निंबाळकर, राजू कारंडे, रेवण शिंदे, मनधीर शिंदे या सर्वांनी मनापासून प्रयत्न केले.
स्वच्छता अभियान समारोप प्रसंगी श्रीक्षेत्र संगोबा कमिटीच्या वतीने संत निरंकारी मंडळाचा सन्मान करण्यात आला तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी या स्वच्छता अभियानाचे कौतूक केले. स्वच्छता अभियाना नंतर नारायण जाधव आणि सहकारी यांनी लंगरची सुंदर व्यवस्था केली. सर्वांनी लंगरचा आस्वाद घेतला अन् शेवटी सुंदर कार्य संपन्न झाल्याबद्दल ब्रँचमुखी पोपट थोरात यांनी सर्वांचे आभार मानले.