
करमाळा प्रतिनिधी
भीमा सिना जोड कालवा बोगद्यावरील लाभक्षेत्रातील गावांना शेतीच्या सिंचनासाठी बोगद्याद्वारे पाण्याचे आवर्तन तातडीने सुरू करावे अशी मागणी मकाई चे माजी चेअरमन व शिवसेना जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांनी आज येथे केली. याबाबत अधिक माहिती देताना बागल म्हणाले की, भीमा सीना जोड कालवा बोगद्याद्वारे ३ जानेवारीपासून चालू असलेले

तीनशे क्युसेक्स या वेगाने पाण्याचे आवर्तन सुरू होते परंतु 15 फेब्रुवारी रोजी ते अचानक बंद करण्यात आले. त्यामुळे करमाळा विधानसभा कार्यक्षेत्राला माढा तालुक्यातील जोडलेल्या छत्तीस गावापैकी उपळवटे, ढवळस, भोगेवाडी,जाखले, रोपळे, कव्हे, बारलोणी, चोबे पिंपरी, महादेववाडी व दहिवली या बोगद्यावरील लाभक्षेत्रातील गावांमधील शेतीच्या सिंचनाची अडचण निर्माण झाली असून गहू, हरभरा, ऊस, ज्वारी, केळी, मका, इत्यादी पिकांना याचा फटका बसत आहे. उजनी

धरणामध्ये यावर्षी समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच उन्हाची तीव्रता यावर्षी जानेवारीच्या अखेर पासून सुरू झाली असल्याने लाभक्षेत्रातील वरील नमूद केलेल्या गावांच्या सिंचनाची व्यवस्था कोलमडली आहे. दिनांक 15 फेब्रुवारी रोजी बोगद्याद्वारे सोडण्यात येणारे पाणी बंद केले असल्याने हातातोंडाशी आलेली पिके आता करपू लागली असून त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी जलसंपदा विभागाने तातडीने भीमा सीना जोड कालव्याद्वारे बोगद्याद्वारे त्वरित पाण्याचे आवर्तन सुरू करण्याची मागणी दिग्विजय बागल यांनी शेवटी केली याबाबत जलसंपदा अधिकाऱ्यांची बागल यांनी संपर्क साधला.