
करमाळा प्रतिनिधी
शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या पेरणी साठी शासनाकडून सरसकट सवलतीच्या दरात बियाणे देण्यात यावे या बाबत तहसिलदार शिल्पा ठोकडे यांना भाजपा यूवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सागर दौंड यांनी निवेदन देवून मागणी केली आहे. या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे

की, सध्या तालुक्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झाला आहे. सर्व शेतकरी सध्या खरीप पिकांच्या पेरणीसाठी वाफस्याच्या प्रतिक्षेत आहेत. २-४ दिवसात पेरणी साठी वाफसा होईल तो पर्यंत पेरणीसाठी बियाणे मिळणे आवश्यक आहे. सध्या शाळा सुरु होत असून चालु शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया चालु आहेत मागील वर्षी भिषण दुष्काळी परिस्थिती होती त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मुलामुलींच्या प्रवेशासाठी, त्यांचे दप्तर, शालेय साहित्य खरेदी साठी चार पैसे शेतकऱ्यांना लागणार आहेत त्यामूळे शासनाने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील उडीद, तूर, मूग, मका, सुर्यफुल,कांदा, सोयाबीन, इ. पिकांचे बियाणे सवलती मध्ये देणे गरजेचे आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
