करमाळा जेऊर

अवकाळीने नुकसान झालेल्या केळी व फळबाग पिकांची शेतकऱ्यांना एकरी दिड लाख रुपये मिळावी अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी केली. जिल्हाधिकारी यांना आज याबाबत एक निवेदन सादर करण्यात आले. याबाबत प्रसिध्दी

माध्यमांना माहिती देताना माजी आमदार पाटील यांनी सांगितले की, अवकाळी पावसाचा केळी व फळबागांना तडाखा बसुन आता काही दिवस उलटले. परंतू शासनाने याबाबत अधिक गांभिर्य दाखवले नाही. सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने व‌ वादळाने नूकसान झालेल्या भागात करमाळा तालुक्यातील भाग हा सर्वाधिक आणि प्राधान्याने येतो. यामुळे प्रशासनाने एक विशेष भाग म्हणून याबाबत कार्यवाही करणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता जिल्हाधिकारी यांनी नुकसान ग्रस्त भागास भेट देऊन पाहणी केली असती तर प्रशासनाकडूनची पुढील पाऊले अधिक गतिने पडली असती. आता किमान नुकसान

.झालेल्या पिकांचे आणि फळबागांचा अहवाल तातडीने तयार करुन एकरी दिड लाख रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी. यंदाचा केळी व फळबाग उत्पादनाचा खर्च हा मागील वर्षाच्या तुलनेत जादा झालेला आहे. उजनीची पाणी पातळी कमी झाल्याने प्रत्यक्ष पाणी पातळी पर्यंत चारी खोदकाम, वीजेचे पोल व‌ केबल आदि खर्चाचा भार उत्पादन‌ खर्चावर पडलेला आहे. शासनाने ही बाब प्राधान्याने लक्षात घेऊनच नुकसान भरपाई अहवाल तयार करावा. जुन मध्ये शैक्षणिक वर्षास सुरुवात होत असल्याने मुलांची शैक्षणिक फि आदिचा खर्च शेतकऱ्यांना करावा तर लागणार आहे परंतू नवीन पिकाची लागण सुध्दा नव्या जोमाने करावी लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत मिळणे गरजेचे असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. जर शासनाने अथवा प्रशासनाने या प्रश्नावर तोडगा काढला नाही तर मात्र आपणास आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागणार असल्याचा सुचक इशाराही पाटील यांनी दिला. लवकरच करमाळा तालुक्यावर आलेल्या या नुकसानीचा अहवाल देशाचे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना सादर करणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *