
आई-वडिलांची मान उंच राहील असे काम विद्यार्थ्यांनी करावे – राजेंद्र बारकुंड
करमाळा प्रतिनिधी
मुलेही आई-वडिलांची संपत्ती असते यामुळे मुलांनी आपल्या आई-वडिलांची मान समाजात सातत्याने उंच राहील किंबहुना आपल्या आई-वडिलांना आपल्या कृतीमुळे आपल्या वागणुकीमुळे समाजात मान खाली घालावी लागेल असे कृत्य करू नये शिक्षण घेत असताना आपले चारित्र्य सांभाळणे सुद्धा प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीचे कर्तव्य आहे. असे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी व्यक्त केले.

चिखलठाण व चिखलठाण पंचक्रोशितील इयत्ता 10 वी मधील 80% पेक्षा जास्त गुणांनी पास झालेल्या सर्व युवक युवतीचे जाहीर कौतुक व सत्कार शासकीय सेवेत निवड झालेल्या तसेच शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याचा गुणगौरव सोहळा चिकलठाण येथे पार पडला.

दरवर्षी सातत्याने गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्याचा उपक्रम प.उपाध्यक्ष राजेन्द्र बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून सदर कार्यक्रमासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे(प्रशासकीय संचालक,आदिनाथ कारखाना), नासीर कबीर,अशोक नरसाळे, चिखलठान सोसायटीचे चेअरमन विकास (बापू) गलांडे, हेमंत बारकुंड, रामेश्वर गलांडे, चंद्रकांत सुरवसे, सुखदेव नेमाने, अविनाश येवले उपस्थित होते.

पुढे बोलताना राजेंद्र बारकुंड म्हणाले की, चिखलठाण मधून दरवर्षी सात ते आठ मुले पोलीस भरतीला जातात अनेक गुणवंत विद्यार्थी प्रशासकीय सेवक काम करत आहे मात्र इथून पुढे आयपीएस चे स्वप्न बघण्याचे काम चिखलठाण येथील विद्यार्थ्यांनी करून आमचे स्वप्न साकार करावे, असे आवाहन केले.

अध्यक्षस्थान बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले, दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला ज्या विषयात आनंद मिळतो अशा विषयात सहभागी होऊन नोकरीच्या मागे लागता चांगली शिक्षण घेऊन उद्योजक बनण्याची स्वप्न बघावे.