
करमाळा प्रतिनिधी
हर घर तिरंगा अभियानाच्या निमित्ताने करमाळा शहरात भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात संपन्न झाली. करमाळा शहरातील जीन मैदान येथून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. या तिरंगा बाईक रॅलीस माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तिरंगा हातात घेऊन मोठ्या संख्येने युवक, नागरिक, माजी सैनिक, सर्वपक्षीय पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक व कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. रॅलीच्या मार्गावर करमाळा शहरातील व्यापारी व नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. अनेक ठिकाणी नागरिकांनी रॅलीवर पुष्पवृष्टी करून तिरंग्याला मानवंदना दिली. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना व माजी सैनिकांना संबोधित केले. देशाचा तिरंगा हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा विषय असून देशप्रेमाची भावना प्रत्येकाच्या मनात कायम जागृत राहिली पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अक्रूर शिंदे यांनी सर्वांना देश प्रेमाविषयी मार्गदर्शन केले. रॅलीमध्ये करमाळा तालुक्यातील अनेक माजी सैनिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. देशसेवेसाठी आपले योगदान देणाऱ्या माजी सैनिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांच्या वीरमाता व वीरपत्नींचाही सन्मान करून त्यांच्या त्यागाला अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमामुळे करमाळा शहरात दिवसभर देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत तिरंग्याप्रती आपला आदर आणि देशप्रेम व्यक्त केले. या भव्य तिरंगा बाईक रॅलीचे नियोजन भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिमचे जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी सैनिक, युवक, व्यापारी आणि करमाळा शहरातील नागरिकांनी मोठे सहकार्य केले.
हर घर तिरंगा अभियानाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीमुळे करमाळा शहरात राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाली असून, तिरंग्याचा सन्मान आणि देशभक्तीचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. जीन मैदान येथून सुरू झालेली रॅली करमाळा शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत श्री देवीचा माळ येथील अथर्व मंगल कार्यालय येथे पोहोचली. याठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला.