
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार” देण्यात येतो. मात्र, तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याचे समोर आले आहे.

शासन निर्णय अस्तित्वात असतानाही अनेक ठिकाणी पात्र महिलांची निवड, सत्कार व पुरस्कार वितरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे शासनाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा लाभ ग्रामीण भागातील कर्तृत्ववान महिलांना मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.

याबाबत लक्ष्मी संजय सरवदे (माजी सरपंच, घारगाव) यांनी गटविकास अधिकारी (बीडीओ) यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. तसेच ज्या ग्रामपंचायतींनी शासन निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही, त्यांच्याकडून खुलासा मागवून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शासनाच्या महिला सन्मान उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि पात्र महिलांना न्याय मिळावा, यासाठी पंचायत समिती प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
