
करमाळा प्रतिनिधी
अनेक वर्षांपासून रखडलेल्या जातेगाव व मांगी परिसरातील वीजेच्या कामाचा प्रश्न सुटला असुन २० किमी उपवाहिनी कामाची सुरुवात लवकरच होणार असुन एका महिन्याभरात हे काम पुर्ण होणार असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.

याबाबत अधिक सविस्तर बोलताना सांगितले की, करमाळा तालुक्यातील वीजेच्या प्रश्नावर तोडगा निघाला पाहिजे यासाठी आपण एक आमसभा व दोन महावितरण कामे आढावा बैठका घेतल्या होत्या. यातील बहुतांश कामे मार्गी लागली आहेत. या बैठकीत उपस्थित केलेल्या जातेगाव मांगी परिसरातील वीजेच्या प्रश्नावर आता आपल्या पाठपुराव्यामुळे मार्ग निघाला आहे. मांगी व जातेगाव येथील ३३/११ केव्हीए सबस्टेशनची ५ एमव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवले गेले आहेत. जातेगाव येथे ५ एमव्हीए एक तर मांगी येथे दोन (एकुण १० एमव्हीए) ट्रान्सफॉर्मर वरुन फिडरच्या कामासाठी ५० लक्ष रुपये निधी मिळाला असुन यातील २० किमी अंतराच्या ११ केव्ही उपवाहिनी कामाची सुरुवात लवकर केली जाईल. यामुळे जातेगाव, पोथरे, मांगी, कामोणे, बिटरगाव श्री, आळजापुर, खडकी या गावातील शेतीपंपाच्या वीजेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला जाणार आहे. या भागातील शेतकऱ्यांना अत्यंत गरजेचे असलेले काम आता मार्गी लागले असुन साधारण एक ते दिड महिन्यात हे काम पुर्ण होऊन या गावांना प्रत्यक्ष वीजेचा लाभ मिळणार असल्याने आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.

गुरुवारी दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या शुभहस्ते पोथरे ता. करमाळा येथे या कामांचा शुभारंभ होणार असुन शेतकऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आदिनाथचे संचालक देवानंद बागल यांनी केले. यावेळी आदिनाथ संचालक डॉ. हरीदास केवारे, पोथरे सरपंच अंकुश शिंदे, तानाजी शिंदे (जातेगाव), भाऊसाहेब खरात (खडकी), प.स.सदस्य स्वप्नील काळे,हरीदास मोरे बिटरगाव श्री, तात्यासाहेब काळे (आळजापुर), पंकज नलावडे (कामोणे) आदि उपस्थित होते.