मुंबई. दि. 24 : महाराष्ट्रात माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी विविध अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर, नवी मुंबई येथील सिडकोच्या जागेवर श्री सत्य साई संजीवनी केंद्र उभे राहिले आहे. या केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्री सत्य साई संजीवनी केंद्रामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत टू-डी-इको शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांद्वारे विविध जिल्हा रुग्णालयांमध्ये हृदयरोग तज्ञांकडून एकूण २,५०७ टू-डी-इको तपासण्या करण्यात आल्या. तसेच जन्मजात हृदयरोग (सीएचडी) उपचारासाठी राज्यभरातील आरबीएसके पथकांमार्फत ३२२६ बालकांवर श्री सत्य साई संजीवनी केंद्र येथे उपचार करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार श्री सत्य साई संजीवनी केंद्रांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि सातारा जिल्ह्यातील जावळी या आदिवासी बहुल तालुक्यांना दत्तक घेऊन तेथे विशेष आरोग्य उपक्रम राबविले. तसेच पुण्यातील शहरी झोपडपट्ट्यांमध्ये आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यात आल्या. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात आरोग्य सेवा पोहचविण्यात येत आहेत.

विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये बालकांमधील जन्मजात हृदयरोग तपासणीसाठी मेगा शिबिरे सुरू असून, दुर्गम भागातील बालकांनाही अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होत आहेत.

नवी मुंबई येथे बांधकाम कामगार तसेच वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी विशेष आरोग्य प्रकल्प राबविण्यात येत आहेत. तसेच अंगणवाडी सेविकांसाठी नॉन-कम्युनिकेबल डिसीज (एनसीडी) आणि कर्करोग तपासणी प्रकल्पही सुरू करण्यात आला आहे.

याशिवाय, आजपर्यंत आशा, अंगणवाडी सेविका, सहाय्यक परिचारिका आणि वैद्यकीय अधिकारी अशा ३५०० हून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांना क्षमता विकास प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे सर्व उपक्रम राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सर्वसमावेशक आणि परिणामकारक करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *