करमाळा प्रतिनिधी
कमलाई साखर कारखान्याने उसाचे बिल पाच दिवसांमध्ये जर नाही काढले तर कारखाना स्थळावर तीव्र स्वरूपाची आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर यांनी दिला. डिसेंबर महिन्यामध्ये गाळप केलेल्या उसाचे बिल एक रुपयाही शेतकऱ्याच्या खात्यावर अजून जमा केलेला नाही. गाळप होऊन चार महिने उलटून गेले तरीही कमलाई साखर कारखाना शेतकऱ्यांची बिले देण्यास तयार नाही. लग्नसराई चालू आहे, ऊसाला रासायनिक खत उसाची खुरपणी बांधणी करावयाचे आहे, शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे तरीही कमलाई सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांची बिले देत नाही. बाकीच्या सर्व साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊस बिल खात्यावर जमा केलेले आहेत परंतु कमलाई साखर कारखाना शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वाट पाहत आहे का ? चार ते पाच महिने झाले ऊस गाळप होऊन तरीही उसाची बिले अजून जमा न केल्यामुळे शेतकऱ्यांना व्यापारी खत बी बियाणे उधार देत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात व्याजाने पैसे घेण्यासाठी जावं लागत आहे. कमलाई साखर कारखान्याच्या प्रशासनाने ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत. उसाचे बिल चार ते पाच दिवसांमध्ये न मिळाल्यास कारखान्याच्या साइटवर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा सुपनवर यांनी दिला. यावेळी महेंद्र शिंदे, नवनाथ शिंदे, नाथाभाऊ नरुटे, परमेश्वर कांबळे, विजय हाके, बाळू हाके, आदि शेतकरी उपस्थित होते.