
करमाळा प्रतिनिधी
शहरात उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रभाग क्रमांक ६ मधील साठे नगर आणि खाटिक गल्ली परिसरातील नागरिकांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी चेतन रोहिदास आल्हाट यांनी करमाळा नगरपरिषदेला लेखी निवेदन दिले.

या निवेदनात साठे नगर स्मारक परिसर आणि खाटिक गल्लीतील नाले हैदर समोरील नगरपरिषदेच्या मालकीच्या खुल्या जागेत नवीन बोअरवेल (कूपनलिका) खोदून देण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रभाग ६ मधील काही भागात गेल्या काही दिवसांपासून पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली असून, महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ही अडचण ओळखून नगरसेविका सुवर्णा रोहिदास आल्हाट यांचे चिरंजीव चेतन आल्हाट यांनी पुढाकार घेऊन प्रशासनाकडे या सुविधेचा पाठपुरावा केला आहे.

यावेळी चेतन आल्हाट यांनी नमूद केले की, “नागरिकांच्या मूलभूत गरजांमध्ये पाणी सर्वात महत्त्वाचे आहे. साठे नगर आणि खाटिक गल्ली परिसरात बोअरवेलची सुविधा झाल्यास येथील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करता येईल. प्रशासनाने यावर त्वरित कार्यवाही करावी, अशी आमची विनंती आहे.”
या निवेदनामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, आता नगरपरिषद प्रशासन यावर किती लवकर निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.