
करमाळा प्रतिनिधी
मांगी तलाव योजना ही परिसरातील बारा गावांसाठी आहे. याचे पाणी चौंडी येथे भाजपा नेते मंडळी घेऊन जात आहे, हे नेते मंडळी सत्तेचा गैरवापर करत आहे, अशी माहिती राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस संतोष वारे यांनी दिली आहे. सध्या तलावात या भागातील शेतकरी नागरिकांना पुरेल येवढेच पाणी आहे.

मध्यंतरी मांगी तलावाला पाणी नसल्यामुळे तलाव सारखा बंद असतो. मांगी तलावात फक्त पावसाचे पाणी असते. करमाळा तालुक्यातील नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर गाठीभेटी घेऊनही मांगी तलाव योजनेचे काम अद्याप चालू झालेले नाही. तलाव परिसरातील 12 गावांना पाण्याची समस्या असताना तलावाचे पाणी चौंडीला नेण्यासाठी शासनाची मंजुरी मिळाली आहे. तलावात ज्या नागरिकांच्या जमिनी गेल्या म्हणजेच परिसरातील बारा गावातील नागरिकांचे तेथे पहिला हक्क आहे.

भाजपने मांगी तलावात अधिकार दाखवण्यापेक्षा गांगर्डी तलावावर आपला अधिकार दाखवावा, असेही वारे यांनी सांगितले. “वेळ आली तर रक्ताचा सडा सांडू, पण ही पाईपलाईन मांगी तलावातून चौंडीला जाऊ देणार नाही”, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संतोष वारे यांनी दिला आहे.