
करमाळा प्रतिनिधी
या कार्यक्रमामुळे संपूर्ण प्रेक्षागृह भक्तिरसाने ओथंबून गेले असून उपस्थित प्रेक्षकांना अध्यात्मिक समाधानाचा अनुभव मिळाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच वातावरण भक्तिमय झाले होते. विद्यार्थ्यांनी रामायणातील विविध प्रसंगांचे सादरीकरण नाट्य, संवाद, संगीत व भावपूर्ण अभिनयाच्या माध्यमातून केले. प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, हनुमान व रावण यांची भूमिका साकारताना विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अभिनयकौशल्य दाखवले.

या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, संस्थेच्या सचिव माया झोळ, संस्थेच्या पदाधिकारी सारिका झोळ, जयमाला बांदल, धनंजय अडसूळ, लालासाहेब जगताप, कौशल्यादेवी जगताप यांच्यासह संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर, शाळेच्या संचालिका नंदा ताटे व शाळेच्या प्राचार्या सिंधू यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या तांत्रिक व स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून त्यांना आध्यात्मिक संस्कारांची नितांत गरज आहे. रामायण व भगवद्गीता हे आपले अमूल्य धर्मग्रंथ असून त्यातील विचार, मूल्ये व जीवनदर्शन हे आपल्या दैनंदिन जीवनात ‘मॅन्युअल’ प्रमाणे वापरले पाहिजे. या ग्रंथांमधील सत्य, कर्तव्य, संयम, त्याग व नीतिमूल्ये अंगीकारल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास निश्चितच होईल, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सचिव माया झोळ व अन्य मान्यवरांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त व नैतिक मूल्यांची रुजवणूक होते, असे मत व्यक्त केले. शाळेच्या संचालिका नंदा ताटे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्राचार्या, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
रामायणाच्या माध्यमातून साकारलेला हा संस्कारक्षम कार्यक्रम विद्यार्थ्यांसह पालक व उपस्थित प्रेक्षकांच्या मनावर खोलवर ठसा उमटवून गेला.