करमाळा प्रतिनिधी

नवीन रस्त्यांचा आराखड्यात समावेश करण्यासाठी नागरिकांनी तसेच ग्रामपंचायतींनी आवश्यक ती कागदपत्रे संबधित कार्यालयास प्राप्त करुन द्यावीत व मतदार संघातील जास्तीत जास्त दुर्लक्षित पण अत्यावश्यक रस्त्यांच्या निर्मितीसाठी हातभार लावावा असे आवाहन आमदार नारायण आबा पाटील यांनी केले आहे. याबाबत अधिक सविस्तर बोलताना आमदार पाटील यांनी सांगितले की, ग्रामीण भागाच्या विकास आराखड्यांमध्ये रस्त्यांचा समावेश केला जातो, जे वेळोवेळी साधारणपणे २० वर्षांच्या टप्प्यात तपासले जातात. यामुळे करमाळा मतदार संघातील नवीन अथवा सध्या वापरात असलेले पण रस्ते सुधार आराखड्यात म्हणजेच डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये समाविष्ट नसल्याने अनेक रस्त्यांना दुरुस्ती साठी शासनाचा सर्वमान्य निधी मोठ्या प्रमाणात दिला जात नाही. अनेक वाड्या वस्त्या ह्या गावांना जोडण्याचे काम हे रस्ते करत असताना आपणास सदर रस्त्यावर दुरुस्ती साठी निधी केवळ नॉन प्लॅन ऱस्ता आहे म्हणुन करता येत नाही. शासनाकडून रस्ते सुधार योजनेंतर्गत प्रमुख जिल्हा मार्ग, ग्रामिण रस्ता, इतर जिल्हा मार्ग आदि मान्यताप्राप्त व आराखड्यात समावेश होणाऱ्या रस्त्याच्या सुधारणेसाठी आपण विविध हेडखाली निधी आणु शकतो. माझ्या सन २०१४ ते २०१९ या मागील टर्म मध्ये यावर विशेष लक्ष देऊन आणि पाठपुरावा करुन आपण मोठ्या प्रमाणात मतदार संघातील रस्ते विकासासाठी निधी मिळवलाही होता. त्यावेळी सुद्धा केवळ आराखड्यात समावेश नसलेले रस्ते निधी पासुन वंचित राहीले होते. आमदार फंड वापरता नाही काही नियमावली व बंधने असल्याने हे रस्ते तसेच राहिले होते परंतु आता कालमर्यादे नुसार पुढील वीस वर्षाचा रस्ते सुधार विकास आराखडा तयार करण्याचे काम चालू असल्याने नागरिकांनी व ग्रामपंचायतींनी याकडे लक्ष देऊन आपले नवीन रस्ते प्रस्ताव संबंधित विभागाकडे दाखल करावेत. यासाठी लागणारी टोपोशीट, वाढीव विभाजन, गाव नकाशे, ठराव, नकला आदि कागदपत्रे संबधित कार्यालयास सादर करावीत. लवकरच आपण सार्वजनिक बांधकाम विभाग (जिल्हा परिषद) करमाळा व माढा,  वनविभाग व महसुल मधील या संबंधी अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन यात मतदार संघातील नवीन रस्ते मागणी अहवालाचा आढावा घेणार असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *