
करमाळा प्रतिनिधी
करमाळ्याच्या वीर शिवाजी महाराज तलवारबाजी ग्रुपच्या तीन तरुण खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत चमक दाखवत नॅशनल स्पर्धेसाठी झेप घेतली आहे.
महात्मा गांधी विद्यालय, करमाळा येथील श्रुतिका नागनाथ बोळगे (14 वर्षे, इप्पी) प्रकारात तृतीय क्रमांक व आण्णासाहेब जगताप विद्यालय, करमाळा येथील ईश्वरी महेश राऊत (17 वर्षे,इप्पी) प्रकारात द्वितीय क्रमांक व अजिंक्य लक्ष्मण दळवी यांने (19 वर्ष सेबर) प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक मिळवत महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद, यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या खेळाडूंची आता मणिपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

स्पर्धेदरम्यान श्रुतिका आणि ईश्वरी व अजिंक्य यांनी अप्रतिम कौशल्य, एकजूट आणि जिद्दीचे प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुरुवातीपासूनच त्यांनी दमदार खेळ दाखवत सलग सामने जिंकले आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील बलाढ्य खेळाडूंना पराभूत करत आपल्या श्रेष्ठतेची छाप उमटवली.
त्यांच्या विजयी प्रवासात पुणे, लातुर, मुंबई, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आठ विभागातील खेळाडूंना त्यांनी पराभूत केले. या यशामागे सर्व शाळांचे मुख्याध्यापक, महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश काटुळे सर, सोलापूर जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे सचिव दिपक शिंदे सर, पवन भोसले सर, राहुल मेहत्रे, अक्षय माने, नागनाथ बोळगे सर, संतोष झिंजाडे सर, सुरज वायकुळे सर आणि अभिषेक कुतवळ सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या खेळाडूंच्या यशामुळे करमाळा तालुक्यात अभिमानाची भावना व्यक्त होत असून राज्यस्तरावरही त्यांच्याकडून भव्य कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.