
करमाळा प्रतिनिधी
केतुर नंबर २ या गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे गावातील रस्त्यांवर आणि मोकळ्या जागांमध्ये सर्वत्र पाण्याचे डबके साचलेले आहेत. यासोबतच परिसरात गवताचे मोठ्या प्रमाणात वाढलेले प्रमाणही दिसून येत आहे. या दोन्ही कारणांमुळे गावात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून गावकऱ्यांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
गावातील अनेक भागांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढत आहे. त्यामुळे चिकनगुनिया, मलेरिया आणि डेंग्यू सारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की, संध्याकाळी आणि सकाळच्या वेळेत डासांचे प्रमाण अत्यंत वाढते असून लहान मुलं आणि वृद्ध नागरिक यांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे.

ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे मागणी केली आहे की, त्वरित कीटकनाशक फवारणी करून गावातील डास नियंत्रणावर प्रभावी उपाययोजना कराव्यात. तसेच पाणी साचलेली ठिकाणे स्वच्छ करून निर्जंतुक करावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, “ग्रामपंचायतीने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक आहे. आरोग्य विभागाच्या मदतीने योग्य वेळी फवारणी न झाल्यास गावात रोगराई पसरण्याची शक्यता आहे.”
गावातील नागरिकांनी स्वच्छतेबाबत जागरूकता ठेवावी, साचलेले पाणी व कचरा त्वरित काढून टाकावा आणि ग्रामपंचायतीनेही नियमित फवारणी करून लोकांच्या आरोग्याचे रक्षण करावे, अशी सर्व ग्रामस्थांची एकमुखाने मागणी आहे.
केतुर ग्रामस्थांनी केलेली ही मागणी तातडीने मान्य करून ग्रामपंचायतीने कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.