
करमाळा प्रतिनिधी
ज्याप्रमाणे भाऊ बहिणीची रक्षा करतो त्याचप्रमाणे एक सैनिक सीमेवर लढून आपल्या जीवाची तसेच घरादाराची परवा न करता देशासाठी लढतो आणि देशाचे रक्षण करतो, सैनिकांकडून नेहमीच त्याग, शौर्य, देशप्रेम दिसून येते त्यांना देशाचे रक्षण करता करता प्रसंगी वीरमरण ही पत्कारावे लागते असे मत आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळ करमाळा चे तालुकाध्यक्ष अंकुर शिंदे यांनी व्यक्त केले. ते मंडळाच्या वतीने सीमेवरील लढणाऱ्या सैनिकांसाठी “एक राखी सैनिकांसाठी” या उपक्रमांतर्गत सैनिकांना रक्षाबंधन सणानिमित्त राख्या पाठवताना करमाळा येथील पोस्ट ऑफिस येथे भावना व्यक्त केल्या.

यावेळी दुर्गा वाहिनी करमाळा यांच्यावतीने जवानांना भेटकार्ड मिठाई तसेच 500 राख्या पाठवण्यात आल्या. या राख्या जम्मू-काश्मीर येथील उरी येथील मराठा लाईफ इन्फंट्री येथील जवानांना पाठवण्यात आल्या.
पुढे ते म्हणाले की, रक्षाबंधन हा उत्सव मुळात भाऊ बहिणींच्या नात्यामधील प्रेम जिव्हाळा सौहार्दय दर्शवितो नात्यामधील गोडवा वाढवणारा हा सण आहे. निश्चितच सैनिकांना आपल्या मायभूमीतील बहिणींच्या राख्या आल्यामुळे त्यांचे मनोबल वाढणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा उपक्रम आम्ही राबवित आहोत. यावेळी सैनिकाकडून जय हिंद, भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणा दिल्या. करमाळा तालुक्यातील सर्व आजी-माजी सैनिक यामध्ये सहभागी असतात.

यावेळी तालुकाध्यक्ष अंकुर शिंदे, माजी सैनिक शंकर शिंदे, सुनील दौंडे, नारायण खंडागळे, अशोक शिंदे, गोपीनाथ हाके, अरुण काशीद, राजाराम जाधव याबरोबर दुर्गावाहिनीच्या प्रखंड संयोजिका पायल परदेशी, सायली परदेशी तसेच पोस्ट मास्तर उदय बंडगर तसेच डॉ. श्रीराम परदेशी, सचिन चव्हाण, नरेंद्रसिंह ठाकुर, अमोल ननवरे याचबरोबर पोस्ट खात्यामधील गणेश तर्कैवाड, गणेश ढवळे, अशोक सरडे, सीमा गोसावी, विजय कुलकर्णी, लक्ष्मण पालखे कनिष्क आदी जण उपस्थित होते.
