
करमाळा प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप दि. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी पोथरे गावी मोठ्या उत्साहात पार पडला. या समारोप सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. बाबूराव हिरडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य एल. बी. पाटील होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. डॉ. अभिमन्यू माने यांनी केली. त्यांनी या सात दिवसांच्या शिबिरात विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्यांचा आढावा मांडला. प्रमुख पाहुणे ॲड. बाबूराव हिरडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोणत्याही परिस्थितीला कारणीभूत न ठरवता आत्मविश्वास आणि कष्ट यांच्या जोरावर यश संपादन करावे.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजलेल्या सामाजिक भानाचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यात आपापल्या गावात समाजसेवा करावी आणि राष्ट्राच्या प्रगतीत हातभार लावावा, असे आवाहन केले.
या शिबिरास पोथरे गावचे सरपंच अंकुश शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले. या शिबिरात पन्नास शिबिरार्थी सहभागी झाले होते. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. मुळीक एस. डी., प्रा. सोनवणे, डॉ. गायकवाड मॅडम, प्रा. विटूकडे आणि इतर प्राध्यापकांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजया गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. कृष्णा कांबळे यांनी मानले. संपूर्ण समारोप सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.