करमाळा प्रतिनिधी

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या पालखी सोहळ्याचे यंदा २७ व्या वर्षी करमाळा शहरात आगमन होत असून, त्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट, फंड गल्ली, करमाळा यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. २७ वर्षापासून अविरत सेवा देत असून यंदाही त्याच पद्धतीचा उत्साह दिसून येत आहे.

श्री स्वामी समर्थांच्या पालखी पादुकांचे आगमन गुरुवार, दि. २ जुलै रोजी सायंकाळी करमाळा शहरात होणार असून, या निमित्ताने सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, प्रवचने, कीर्तने, भजन तसेच हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी पारायण, प्रवचन आणि रात्री हरिपाठ व हरिकीर्तन असे दररोजचे कार्यक्रम होणार आहेत.

सप्ताहामध्ये विविध प्रवचनकार व कीर्तनकार उपस्थित राहून भाविकांना मार्गदर्शन करणार आहेत. करमाळा तालुक्यासह परिसरातील अनेक हरिभक्त, कीर्तनकार व भजन मंडळे या धार्मिक सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

गुरुवार, दि. २ जुलै रोजी सकाळी ह.भ.प. विवेकानंद मंजरतकर महाराज यांचे कालनिर्णयात्मक कीर्तन होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता श्री स्वामी समर्थ पालखी पादुकांचे आगमन होईल. सायंकाळी ८ वाजता महाआरती तर त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या पालखी सोहळ्याचे हे २७ वे वर्ष असून, या धार्मिक उत्सवामुळे करमाळा शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. सर्व स्वामीभक्तांनी अखंड हरिनाम सप्ताह, महाआरती व महाप्रसाद कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *