करमाळा प्रतिनिधी
ठार मारण्याच्या उद्देशाने केलेल्या खुनी हल्ल्याच्या गंभीर गुन्ह्यातून आरोपींना वाचविण्यासाठी करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक रणजीत माने आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल भाऊराव शेळके यांनी गुन्हा नोंदवीण्यात आणि गुन्ह्याचा तपास करण्याच्या कर्तव्यात जाणिवपूर्वक हालगर्जीपणा करुन पदाचा व अधिकारांचा गैरवापर केल्याबद्दल त्यांचेवर कारवाई करण्याची मागणी केम येथील प्रा. डॉ. भारत बिचितकर यांनी सोलापूर ग्रामिण पोलीस अधिक्षक यांचेकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या तक्रार अर्जात त्यांनी नमूद केले आहे की, मौजे केम या त्यांच्या मुळ गावी त्यांच्या मालकीच्या शेतजमीनीचा वाद कोर्टात न्यायप्रविष्ट असताना कुसूम गावडे हिने बेकायदेशीरपणे ती शेतजमीन उमेश इंगळे यास बेकायदेशीर विक्री केली. त्यावर करमाळा येथील न्यायालयाने त्या शेतजमीनीतील प्रा. बिचितकर यांच्या शंततापूर्ण वहिवाटीस हरकत अडथळा निर्माण करु नये, असा मनाई हुकूम दिला आहे. तरिही कायदा हातात घेवून बळजबरीने जमीनीचा ताबा मिळविण्यासाठी उमेश इंगळे हा गावातील गावगुंड व सराईत गुन्हेगारांना सुपारी देवून मागील एक वर्षापासून त्यांच्यावर वारंवार खुनी हल्ले करत आहे. त्याबाबत वेळोवेळी तक्रारी करुन देखील पोलीसांनी आरोपींवर कारवाई करण्यात जाणिवपूर्वक निष्काळजीपणा केल्याचा आरोप बिचितकर यांनी त्यांच्या तक्रार अर्जात केला आहे.
यापूर्वीच्या तक्रारींवर करमाळा पोलीसांनी कारवाई न केल्यामुळे दि. 26.04.2026 रोजी उमेश इंगळे, कुसूम गावडे, सचिन तळेकर आणि गजानन गावडे यांनी प्रा. बिचितकर यांचा खुन करण्याचा कट रचला आणि त्या ठरलेल्या कटानुसार अभिजित तळेकर, शंकर तळेकर, पंडीत तळेकर व निखिल उर्फ़ धोंडीराम तळेकर यांनी दि. 27.04.2026 रोजी प्रा. बिचितकर आणि त्यांचे 92 वर्षे वयाचे वडील यांचेवर प्राणघातक खुनी हल्ला केला. त्याचा गुन्हा नोंदविण्याच्या कर्तव्यात पोलीस निरिक्षक रणजित माने आणि कॉन्स्टेबल भाऊराव शेळके यांनी आरोपींना वाचविण्यासाठी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यास विलंब करणे, सौम्य कलमे लावणे, मुख्य चार आरोपींची नावे गुन्ह्यातून वगळणे, गुन्हा नोंद होऊन एक महिना उलटला तरीही आरोपींना मोकाट सोडून पुरावे नष्ट करण्यासाठी आणि साक्षिदारांवर दबाव आणण्यासाठी संधी देणे यासारख्या गंभीर अनियमितता केल्याचा संशय प्रा. बिचितकर यांनी तक्रार अर्जात व्यक्त केला आहे.
त्यावर व्यतिथ होऊन प्रा. बिचितकर यांनी तपासाच्या कर्तव्यात जाणिवपूर्वक हालगर्जीपणा केल्याबद्दल करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक रणजित माने आणि हेड कॉन्स्टेबल भाऊराव शेळके यांचेवर कडक कारवाई करावी. गुन्ह्याचे पुनरावलोकन करुन या गंभीर गुन्ह्यात खुनाचा कट रचणे (Conspiracy of Murder), जीवे मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक खुनी हल्ला करणे (Aattempt to Murder) आणि गुन्हेगारी अतिक्रमण करणे (Criminal Trespass) अशा स्वरूपाची कलमे वाढविण्यात यावीत. खुनाचा कट रचणारे श्री उमेश इंगळे, श्रीमती कुसूम गावडे, श्री सचिन तळेकर आणि गजानन गावडे या चार मुख्य आरोपींची वगळण्यात आलेली नावे गुन्ह्यात समाविष्ट करावीत. गुन्ह्याचा तपास निष्पक्ष होण्यासाठी तो वरिष्ठ तपास यंत्रणेकडे वर्ग कराण्यात यावा. सदर गुन्ह्यातील आरोपी वारंवार गुन्हे करणारे सराईत संघटीत गुन्हेगार असल्यामुळे त्यांचे विरुध्द “मकोका” अंतर्गत कारवाई करण्यात यावी. अशा प्रमुख मागण्या प्रा. बिचितकर यांनी सोलापूर ग्रामिण पोलीस अधिक्षक यांचेकडे केल्या असून याबाबत कारवाई न झाल्यास योग्य त्या सक्षम न्यायालयात धाव घेणार असल्याचे प्रा. बिचितकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
…………..
आम्ही कोणालाही वाचविण्याचा प्रयत्न केलेला नाही हे सर्व काही चुकीचे आहे. सखोल तपास करून योग्य व कायदेशीर कारवाई आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे. – रणजीत माने, पोलीस निरीक्षक करमाळा