
करमाळा प्रतिनिधी
जेऊर ता. करमाळा या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कॅम्प मे महिन्यापासून बंद आहे. कुटुंब कल्याण कॅम्प घेण्यासाठी सर्व आवश्यक गोष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असताना देखील हा कॅम्प मे महिन्यापासून बंद आहे.
भारत सरकारने वाढती लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी सन 1952 मध्ये कुटुंब कल्याण शस्रक्रिया शिबीर सुरु केले. ज्याचा उद्देश लहान कुटुंबाला प्रोत्साहन देणे, आरोग्य सुधारणे होय. “हम दो, हमारे दो” हि घोषणा देत भारत सरकारने कुटुंब नियोजनाची जनजागृती केली.

मात्र जेऊर या ठिकाणची परिस्थिती काही वेगळी आहे. जेऊर या ठिकाणी सर्व व्यवस्था असताना देखील महिला कुटुंब कल्याण ऑपरेशन साठी करमाळा, वरकुटे, केम या ठिकाणी जावे लागत आहे. काही महिलांना तीस-तीस किलोमीटरचा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका ऑपरेशन झालेल्या महिलांना घरपोच सेवा देत नाही. त्यामुळे ऑपरेशन करून आल्यानंतर त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र जेऊर येथे सोडण्यात येते तेथून पुढे ते आपापल्या सोयीने जातात. काही जण फोर व्हिलर आणतात. तर काही जण टू व्हिलर वर जातात. ऑपरेशन कॅम्पला उशिर झाल्यास ऑपरेशन झालेल्या महिलांना रात्री उशिरा सोडले जाते. अंधारात रस्त्यावरचे खड्डे हुकवत लोकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. कॅम्प जेऊर ला होणार आहे असे सांगितले जाते व नंतर अचानक ऐनवेळी कॅम्प कॅन्सल झाला आहे व दुसऱ्या

ठिकाणी पेशंटला नेण्यात येते अशाप्रकारची देखील नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र जेऊर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. टोपे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचा पदभार स्विकारल्यापासून प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था बिकट झालेली आहे. एप्रिल महिन्यात कुटंब कल्याण शिबिरात झालेल्या हलगर्जी पणाबाबत त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. कुटुंब कल्याण शस्रक्रिया झालेल्या महिलांना जमिनीवर झोपवले होते. त्या ठिकाणचे फॅन बंद होते. असे असताना देखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. अनेक जणांनी कारवाईची मागणी केली होती. इतर आरोग्य केंद्रात अश्याच हलगर्जी पणा झाला होता तेव्हा तेथील वैद्यकीय अधिकऱ्यांचे निलंबन झाले होते मात्र डॉ. टोपे यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही तसेच सतत कर्तव्यवावर गैरहजर असणे, प्रसूती न करणे त्यांना या ना त्या कारणावरून इतरत्र पाठवणे. फिटनेस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी येणाऱ्यांना डॉक्टर गैरहजर असल्यामुळे हेलपाटे मारावे लागणे. अश्या असंख्य तक्रारी आहेत. डॉ. रत्नदीप टोपे यांच्यावर आरोग्य विभाग ज़िल्हा परिषद सोलापूर यांच्यामार्फत चौकशी सुरु होऊन काही महिने उलटले तरी कारवाई नाही. यावरून आरोग्य विभागची कारवाई करण्याची मानसिकता नसल्याचे सिद्ध होते.
अजूनही आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांनी या गोष्टीची गंभीर दखल घेतली नाही तर प्राथमिक आरोग्य केंद्र जेऊर येथे धरणे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाऊसाहेब शेळके उपसरपंच भिवरवाडी यांनी दिला आहे.