
करमाळा प्रतिनिधी
करमाळा व इंदापूर तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी उजनी धरणातून पोमलवाडी ते चांडगाव दरम्यान पुल उभारण्याबाबत आमदार नारायण आबा पाटील यांनी नागपूर येथे चालू हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला असता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत म्हटले की, करमाळा तालुक्यातील पोमलवाडी-चांडगाव येथून तालुका इंदापूर येथे नियमित दळणवळण करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून त्यांना उजनी जलाशयातून बोटीद्वारे प्रवास करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. भागातून रस्ता मार्गे इंदापूर भागात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ व इंधन लागत असल्यामुळे जलाशयाद्वारे प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यावेळी सदरच्या कामाच्या निधी बाबत उपाय योजना हाती घेण्याचे नियोजन राहील.

या चांडगाव-पोमलवाडी पुलामुळे अहिल्यानगर, धाराशिव हे जिल्हे पुणे जिल्ह्याशी जोडले जाणार असून मतदारसंघाचा इंदापूर-पुणे शहाराशी संपर्क वाढणार आहे. या पुलाचा टाकळी, खातगाव, केत्तूर, जिंती, पारेवाडी, वाशिंबे तसेच मतदारसंघतील गावांच्या विकासाला चालना मिळणार असल्याने आमदार नारायण आबा पाटील यांच्या कामावर मतदारसंघातील जनता खुश असल्याच दिसून येत आहे.