
करमाळा प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर अनेक वेळा तलाठी यांच्याकडून नाव, आडनाव, वडिलांचे नाव, क्षेत्र अशा प्रकारच्या चुका होतात. चूक दुरुस्त करण्यासाठी तहसीलदार यांचा आदेश घेण्याचा नियम आहे. चूक करणार तलाठी शिक्षा शेतकऱ्यांना म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असाच हा प्रकार आहे त्यामुळे या नियमात बदल होईपर्यंत संघर्ष करणार असल्याचे मत औदुंबर राजे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्याच्या नावे सातबारा उतारा असतो. त्या गावात एकूण क्षेत्र किती आहे. यासाठी आठ अ म्हणजे खाते उतारा त्याच्यावर काही बदल केला असेल तर फेरफार म्हणजे सहा ड असतो याच्यावर काही वेळेला तलाठी

यांच्याकडून चुका होतात. ऑनलाइनला काहींचे गट नंबर, क्षेत्र गायब आहेत, काही शेतकऱ्यांची नावे गायब आहेत, त्यामुळे पीएम किसान योजना, पीक कर्ज, पिक विमा मिळत नाही. सातबारा नाव नसल्यामुळे काही तरुणांचे लग्न जमत नाहीत आणि चूक दुरुस्त करण्यासाठी तहसीलदार यांना अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर तो अर्ज मंडळ अधिकारी म्हणजे सर्कल चौकशीला पाठवला जातो. उताऱ्यावर चूक झाली असेल तर मंडळाधिकारी चौकशीचा अहवाल तहसील कार्यालयाला जातो. या प्रक्रियेला तात्काळ केले तरी सहा महिने ते एक वर्ष जाते आणि अधिकाऱ्याच्या सवडीने म्हटले तर किती काळ लागतो हे सांगता येणार नाही. तहसील कार्यालयाकडे चौकशी अहवाल गेल्यानंतर आदेश काढण्यासाठी शेकडो हेलपाटे शेतकऱ्यांना घालावे लागतात. 20-20 वर्ष, 14-14 वर्ष 7-7 वर्ष अर्ज केले आहेत पण चूक दुरुस्तीचे आदेश निघाले नाहीत अशी अनेक प्रकरणे करमाळा तालुक्यात आहेत. उताऱ्यावर चूक तलाठी करणार आणि दुरुस्त करण्यासाठी शिक्षा शेतकऱ्याला कशामुळे ? असा सामान्य नागरिकांतून सवाल उपस्थित होत आहे. ज्या तलाठ्याने चूक केली त्या तलाठ्याला निलंबित करून त्याच्यामुळे शेतकऱ्याला किती तास त्रास झाला त्याची भरपाई करून चूक दुरुस्ती करावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे नेरले ग्रामपंचायत चे माजी सरपंच व हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक औदुंबर राजे भोसले यांनी केली आहे. या कामी तालुक्यातील राज्यातील शेतकऱ्यांनी सहकार्य करावे अशी आव्हान देखील केले आहे.