माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा …… अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा

करमाळा प्रतिनिधी
माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली 20 मार्च 2025 रोजी पुणे येथे राज्यव्यापी मोर्चा संपन्न झाला, अशी माहिती करमाळा हमाल पंचायत चे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथून विधान भवन पुणे पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात खालील प्रमाणे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा……
माथाडी कायद्यात बदल करणारे विधेयक क्रमांक ३ हे माथाडी कामगारावर अन्याय करणारे आहे. त्यामुळे हे विधेयक त्वरित रद्द करा. तसेच या विधेयका संदर्भात कष्टकऱ्यांचे दैवत डॉ. बाबा आढाव यांच्यासोबत चर्चा करूनच निर्णय घ्यावा. माथाडी मंडळात आवश्यक नोकर भरती त्वरीत करा व ती करतांना माथाडी कामगारांच्या पाल्यांना प्राधान्याने नोकरीत घ्या. त्रिसदस्यीय, जिल्हा माथाडी मंडळ व राज्य माथाडी सल्लागार मंडळाच्या तात्काळ नियुक्त्या कराव्यात. खाजगी बाजार समित्यांमध्ये माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा. शासकीय धान्य गोदाम व अन्यत्र कायद्याप्रमाणे दर महिन्याचे ७ तारखेच्या आत पगार करा आणि जे करणार नाहीत त्यांना १०% दंड आकारण्यात यावा. माथाडी कायद्यात कोणताही एकतर्फी बदल होवू नये म्हणून आपण महामंडळ म्हणून तर प्रयत्न करीत आहोतच पण राज्यातील सर्व माथाडी कामगार संघटनांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. अशा विविध मागण्यांचे निवेदन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, उपाध्यक्ष राजकुमार घायाळ, सरचिटणीस सुभाष लोमटे, सचिव हनुमंत बहिरट, ॲड. राहुल सावंत, मार्गदर्शक नितीन पवार, चंदनजी यांच्या वतीने देण्यात आले. जर माथाडी कामगारांच्या वरील मागण्या मान्य न केल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी दिला

यावेळी गोरख मेंगडे, संतोष नांगरे, राजेंद्र चोरगे, अंबरनाथ थिटे, वालचंद रोडगे, गजानन गावडे, सुरेश बागल, महादेव जगताप, भिमराव सिताफळे, विष्णू गर्जे व मान्यवर उपस्थित होते.
या मोर्चास करमाळा तालुका हमाल पंचायत यांनी पाठिंबा दिला तसेच सोलापूर जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून प्रत्येक केंद्रातून हमाल मापाडी कामगार तसेच महिला कामगार मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.