
करमाळा प्रतिनिधी
अन्याय, अत्याचार विरुद्ध पेटून उठून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रसंगी परिणामाची चिंता न करता भल्याभल्यांना अंगावर घेऊन सत्याची बाजू धरणारे नेतृत्व म्हणून महेश चिवटे सर्वदूर परिचित आहेत.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बालपणातच पतंग, राख्या विक्री करून वेळप्रसंगी फटाक्याच्या दुकानात काम करून शालेय शिक्षण घेत वडीलांच्या कृषी विषयक व्यवसायात मदत करत जीवनाची सुरवात करणारे महेश चिवटे शाळेत शालेय जीवनात सुद्धा हुशार होते.

सातारा सैनिक स्कूल येथे त्यांचा स्पर्धा परीक्षेतून पाचवी मध्ये नंबर लागला होता. मात्र कुटुंबाची जबाबदारी लहानपणापासूनच खांद्यावर असल्यामुळे त्यांनी सैनिक स्कूल ला नंबर लागलेला असताना ती शाळा सोडून करमाळ्यातल्या प्राथमिक शाळेतच नाईलाजाने जाऊन शिक्षण घेणे पसंत केले. लहानपणापासून व्यवसायात लक्ष घालावे लागल्याने इच्छा असुन ही उच्च शिक्षण घेता आले नाही. बारावीपर्यंतच शिक्षण झाले.
आजोबा स्वातंत्र सैनिक मनोहरपंत चिवटे यांच्या सारखाच स्पष्टवक्तेपणा, निर्भीड बाणा व वडील स्वातंत्र्य सैनिक वारसदार संघटनेचे संस्थापक नरसिंह चिवटे यांचा रासायनिक खते, बि-बियाणे व आणि कीटकनाशके यांच्या व्यवसायात लक्ष घालून तो धंदा वाढवला. आजोबा, वडील यांच्याकडून वंशपरंपारेने असलेली निर्भीड पत्रकारितेचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले.
स्वातंत्र्यसैनिक तथा पत्रकार करमाळा नगरीचे नगराध्यक्ष साथी मनोहरपंत चिवटे व वडील नरसिंह मनोहरपंत चिवटे यांच्याकडून पत्रकारिते बरोबर समाजसेवेचा वारसा लाभला व त्यातूनच त्यांना समाजसेवेची आवड लागली पर्यायाने राजकारणात सुद्धा ते सक्रिय झाले. आपले वक्तृत्व कौशल्य, संघटन कौशल्य व उपद्रव्य मूल्य या त्रिसूत्रीच्या जोरावर त्यांनी अनेक पदे उपभोगली मकाई सह, साखर कारखाना संचालक, अर्बन बँक संचालक, कमलादेवी औद्योगिक वसाहत चेअरमन, शिवसेना जिल्हाप्रमुख, सोलापूर जिल्हा नियोजन मंडळ सदस्य, लाडकी बहीण योजना शासकीय सदस्य, कृषी व्यावसायिक संघटना राज्य कार्यकारणी सदस्य, वीरशैव लिंगायत समाज प्रदेश उपाध्यक्ष, शिवसेना प्रसिद्धी प्रमुख, पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी हिंदू हृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचे व हिंदुत्वाचे विचार तळागाळात पोचवण्यासाठी तन मन धनाने काम केले.
माँसाहेब नागरी सह. पतसंस्थेच्या माध्यमातून करमाळा शहरात आर्थिक चळवळ उभी करून त्या माध्यमातून अमरनाथ मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, बनशंकरी सीड्स, मुक्ताई गारमेंट, महेश ऍग्रो एजन्सी, असे व्यवसाय उद्योगात भरारी घेतली. या व्यवसाय उद्योगातून शेकडो बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. कमलादेवी औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग करीत असतानाच उद्योजकांच्या अडीअडचणी समजावून घेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व कर्ज प्रकरण नवीन नवीन उद्योगाची माहिती देण्यासाठी स्थानिक कारखानदारांनीच महेश चिवटे यांना औद्योगिक वसाहतीचे संचालक करून चेअरमन पदाची संधी उपलब्ध करून दिली. या संधीचा महेश चिवटे यांनी उपयोग करत औद्योगिक वसाहती मधील उद्योजकांना कर्ज प्रकरण त्याशिवाय विविध उद्योग व्यवसायाची मार्गदर्शन करून कारखानदार व उद्योजकांची मने जिंकलेली आहेत. गेल्या पंधरा वर्षापासून सलग ते औद्योगिक वसाहतीचे चेअरमन म्हणून काम पाहत आहेत.
करमाळा येथे नव्याने उभी राहत असलेली एमआयडीसीमध्ये सर्वात प्रथम साडेपाच एकराचा भूखंड मोठ्या धाडसाने घेऊन सर्वप्रथम उद्योग सुरू करण्यासाठी मोठे धाडस दाखवणारे महेश चिवटे हे एकमेव आहेत. एमआयडीसी मध्ये सुशिक्षित बेकार व लहान व्यावसायिकांना प्लॉट मिळावा यासाठी उद्योग मंत्र्याकडे सातत्याने पाठपुरावा करून क्लस्टरची मागणी मंजूर करून घेतली त्यामुळे आता छोट्या व्यावसायिकांना सुद्धा एमआयडीसीमध्ये उद्योग करता येणार आहे याचे श्रेय महेश चिवटे यांनाच जाते.
महेश चिवटे यांचे धाकटे बंधू मंगेश चिवटे यांनीही वयाच्या पंधराव्या वर्षापासून सोलापुर, पुणे, मुंबई व दिल्ली येथे शिक्षण घेऊन त्यांनी स्वतःचे विश्व निर्माण करत पत्रकारितेत ठसा उमटवला व ते एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखू जाऊ लागले. त्यामुळे महेश चिवटे ही एकनाथ शिंदे यांचे विचार तळागाळात पोहोचविण्याचे काम करू लागले. गेल्या पाच वर्षाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचंड ताकत महेश यांच्याशी पाठीशी उभा केल्यामुळे जवळपास 70 ते 80 कोटी रुपयांचा निधी करमाळा तालुक्यातील आणू शकले रिटेवाडी उपसा सिंचन प्रश्नसंदर्भात मंत्रालयात दोनदा मीटिंग लावली. आदिनाथ कारखान्याचे प्रशासकीय संचालक मंडळात सदस्य म्हणून करण्याची संधी मिळाल्यानंतर कारखान्याचा 189 कोटी रुपयांचा थक हमी कर्जाचा प्रस्ताव शासन दरबारी सादर केला. सामान्यांचे प्रश्न सोडवू शकतो असा विश्वास निर्माण झाल्यामुळे आज त्यांच्या कार्यालयात रोज शेकडो लोक आपले प्रश्न घेऊन येतात. त्यांचा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी चालता बोलता फिरता जनता दरबार सुरू असतो. जिथे उभा राहील तेथून त्यांचा सर्वसामान्य प्रश्नासाठी मोबाईल सारखा सुरू असतो.
शिस्त वैद्यकीय मदत कक्ष माध्यमातून करमाळा तालुक्यातील रुग्णसेवेला गती दिली असून करमाळा येथे मोफत डायलिसिस सेंटर, कमलादेवी ब्लड बँक, मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, गंगुबाई संभाजी शिंदे नर्सिंग कॉलेज अशा वैद्यकीय क्षेत्रातील संस्था उभा करून तालुक्यातील रुग्णांना आधार देण्याचे काम सुरू केले आहे. आज मोफत डायलिसिस झालेला प्रत्येक पेशंट च्या हृदयात महेश चिवटे यांचे नाव कोरले आहेत. आजपर्यंत करमाळा तालुक्यात शेकडो शिबिर घेऊन कोट्यावधी रुपयांची मोफत औषधे वाटण्यात आली आहे. जवळपास 12000 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले असून मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षातून एक कोटी 80 लाख रुपयांची मदत करमाळा तालुक्यातील रुग्णांना देण्यात आली आहे. करमाळ्यातील कोणताही आजारी रुग्ण असेल तर त्याच्या डोळ्यासमोर पहिले नाव येते महेश चिवटे यांचे.
तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, कृषी खाते अशा सर्वसामान्य खात्यातील सर्व प्रकारचे प्रश्न सुद्धा शेतकरी महेश चिवटे यांच्याकडे जाहीर करतात. एखाद्या भ्रष्टाचाराच्या व अन्यायाच्या प्रकरणात लक्ष घातले तर तडजोड नाही हे त्यांच्या एक स्वभावाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेले हे नेतृत्व म्हणून तालुक्यात ओळखले जात आहे.
कमलादेवी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन झाल्यानंतर उद्योग जगाला चालना देऊन मांगी एमआयडीसीचा पंचवीस वर्षापासून रखडलेला प्रश्न मार्गी लावून त्या ठिकाणी पाच पाच गुंठ्याचे 90 भूखंड पाडून वाटप सुरू केले आहे. स्वतः त्या तिथे साडेपाच एकराचा प्लॉट घेऊन कृषी प्रक्रिया प्रकल्प लवकर सुरू करणार आहे. यातून जवळपास 200 ते 300 लोकांना काम मिळेल तरुणांना काम मिळणार आहे.
करमाळा शहरासाठी अमृत टू जल योजना भुयारी गटार योजना व जलशुद्धीकरण प्रकल्प यासाठी 140 कोटी रुपयांचा शासन दरबारी प्रस्ताव सादर आहे. करमाळा बस स्थानकासाठी नवीन व्यावसायिक गाळे उभारण्यासाठी 15 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. मदत केली तर प्रामाणिकपणे मदत करायची, विरोध करायचा तर तोंडासमोर करायचा व परखडपणे आपले मत व्यक्त करायचे त्यामुळे राजकारणात त्यांचा अनेक वेळा तोटा झाला. हे सर्व करत असताना अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची त्यांची क्षमता ही वाखण्य जोगी असून करमाळा तालुक्यातील बंडखोर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे कै. सुभाष आण्णा सावंत यांच्या तालमीत राजकारणाचे धडे घेतल्यामुळे उपद्रवी मूल्याचा वापर करून सत्ताधाऱ्यांवर प्रशासकीय अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची त्यांची ताकद सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी उपयोगी पडत आहे. आज एक निर्भीड नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण तालुक्यातील जनता पाहत आहे.
करमाळा शहराला कलंक लागलेला अतिक्रमण हा गंभीर विषय मुळासहित उपटून काढण्यासाठी वेळप्रसंगी अनेकांची अनेकांचा विरोध त्यांनी स्वतःवर ओढून घेतला. मात्र सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या अपप्रवृत्तीला विरोध करण्यासाठी ते कधी मागेपुढे पाहत नाहीत हे अनेक प्रसंगातून तालुका वासियांना यांना दिसून आले आहे.
सध्या अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रवृत्ती समाजात कमी होत असून प्रत्येक जण कातडी बचाव धोरण अवलंबून राजकारण समाजकारण करत आहे मात्र त्याला महेश चिवटे हे एक अपवाद ठरत आहेत. त्यांच्या माध्यमातून आगामी काळात अशीच तालुक्याचे जनतेची सेवा घडावी विशेषत: ज्याच्यावर अन्याय होतो त्याला न्याय देण्याची ताकद आई कमलाभवानी त्यांना उदंड आयुष्य देऊन सर्वसामान्य पिढीत रूग्ण हीच या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा…
शब्दांकन नागेश चेंडगे