
करमाळा प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी. पाटील हे होते.

यावेळी ते म्हणाले की, ज्या देशाला संस्कृती असते त्या देशातील भाषा समृद्ध असते. आपला संवाद हा मातृभाषेतून व्हायला हवा, भाषा समृद्धीसाठी वाचन संस्कृती चळवळ उभी करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

मराठी विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात माझी मराठी स्वाक्षरी उपक्रम राबविण्यात आला. यावेळी काजल गावडे, श्यामबाला शिंदे, गायत्री शिंदे, विश्वंभर लांडगे यांनी मराठी भाषेचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. नितीन तळपाडे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. डॉ वंदना भाग्यवंत यांनी केले. आभार प्रा. गौतम खरात यांनी मानले. उपप्राचार्य प्रा. डॉ.अनिल साळुंके यांसह यावेळी सर्व विभागांचे विभाग प्रमुख व विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.