करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दहीगाव पाणी पुरवठा योजनेत तांत्रिक बिघाडामुळे वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे हे माहीत असताना पालिकेने या कामी लागणाऱ्या निधीच्या मागणीचा प्रस्ताव का दिला नाही ? असा सवाल आमदार संजयमामा शिंदे यांनी पालिका प्रशासनाला केला आहे. १९९३ साली सुरू झालेल्या योजनेसाठी दहीगाव येथून पाणी उपसा करणारे २४० अश्वशक्तीचे दोन व २०० अश्वशक्तीच्या विद्युतपंपांमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होणे, शहरांतर्गत असलेल्या जलवाहिन्या खराब झाल्याने बऱ्याच ठिकाणी अपुरा व दूषित पाणीपुरवठा होणे या प्रकारांमुळे शहरवासीयांमध्ये वाढता असंतोष आहे.

      याविषयीच्या अडचणी जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार, मकाईचे माजी संचालक विवेक येवले यांनी न.प.पाणीपुरवठा विभागाचे अभियंता फिरोज शेख यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्यासमवेत आमदार शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी शेख यांनी दोन नवीन विद्युतपंप घेण्यासाठी व अन्य दुरुस्तीसाठी किमान दोन कोटी रुपये निधीची गरज आहे व न.पा. फंडात पैसे नसल्याचे सांगितले. त्यावर आ.शिंदे यांनी हा प्रश्न आज उदभवलेला नाही, मग आजवर तुम्ही या विषयी का गप्प राहिलात ? असा सवाल उपस्थित करून सदरचा निधी मागणीचा प्रस्ताव ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करा, मी निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करतो असे सांगितले. यावेळी माजी नगरसेवक रामकृष्ण माने, अर्बन बँकेचे माजी व्हा.चेअरमन फारूक जमादार, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजयराव पवार उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *