
दुरावलेल्या सर्वांना सोबत घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीस सामोरे जाण्याचा निर्धार.
प्रतिनिधी करमाळा.
वांगी नं.३ येथे श्री मकाईच्या नूतन स्वीकृत संचालकांचा सत्कार व कार्यकर्ता मेळाव्यात मकाईचे मा. चेअरमन दिग्विजय बागल बोलताना सांगितले की, आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीत करमाळा तालुक्यातील अठरा पगड जाती धर्मातील बांधवांना बरोबर घेऊन लोकनेते स्व.दिगंबररावजी बागल मामा यांनी विविध विकास कामांच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन सर्व सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम केले आहे. तोच वारसा पुढे रश्मी दिदी बागल व आम्ही चालवत असून करमाळा तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन बागल यांनी व्यक्त केले.

यावेळी बागल यांनी बोलताना सांगितले की, मकाई सहकारी साखर कारखाना अडचणींतून जात असताना न डगमगता संकटाला तोंड देत स्वतःची शेती, घर गहाण ठेवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. स्व.मामांनी उभी केलेली संस्था कधीही बंद पडू देणार नाही प्रसंगी कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची तयारी आहे असे ही ठामपणे सांगितले. गेल्या दहा वर्षांपासून तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याची सोडवणूक करण्यासाठी सर्व सामान्य जनतेच्या सर्वांगीण प्रगती साठी आपल्या सर्वांच्या हक्काचा, उच्चशिक्षित, विविध प्रश्नांची जाण असलेल्या रश्मी दिदी बागल यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून त्यांना विधानसभेत पाठवावे असेही आवाहन केले. तसेच वांगी परिसरातील रस्ते, वीज, पुनर्वसन नागरी सुविधा व उजनी धरणातील पाणी व्यवस्थापन विविध प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल असा विश्वास दिला. याप्रसंगी नूतन स्वीकृत संचालक पदी निवड झालेल्या गणेश तळेकर, युवराज रोकडे यांचा सत्कार दिग्विजय बागल यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मकाई चे चेअरमन दिनेश भांडवलकर, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब पांढरे, बाजार समितीचे मा. सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर, ज्येष्ठ नेते साहेबराव रोकडे, पांडुरंग जाधव, राऊकाका देशमुख, संपत देशमुख, पांडुरंग शेटे, अर्जुन तकीक, सतीश नीळ, कल्याण सरडे, लक्ष्मण महाडिक, कुलदीप पाटील, देवा ढेरे, लक्ष्मण केकान, संतोष पाटील, डाँ.विजय रोकडे, गणेश झोळ, अजित झांझूर्ने, महेश तळेकर, विलास काटे, जयदीप देवकर मकाई व आदिनाथचे आजी माजी संचालक उपस्थित होते.
……………………
बागल गटापासून दुरावलेल्यांना पून्हा सोबत घेणार.
कार्यकर्ता मेळाव्यात दिग्विजय बागल यांनी बोलताना सांगितले की, आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून बागल गटापासून दुरावलेल्या सर्वांना पून्हा सोबत घेऊन करमाळा तालुक्यातील रीटेवाडी उपसा सिंचन योजना, मांगी तलाव, करमाळा एमआयडीसी, वडशिवने तलाव, उजनी जलाशयावरील पूल तसेच पाण्याचे नियोजन, सीना कोळगाव धरण, रस्ते विकास असे विविध प्रकारचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असून दोन महिन्यात संपूर्ण तालुका पिंजून काढणार असल्याचे बागल यांनी सांगितले.