
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज गायब असणे यामुळे सामान्य जनता आणि बळीराजा पुरता मेटाकुटीस आला आहे. महावितरणच्या या मनमानी कारभाराविरोधात करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराजे जयवंतराव जगताप यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, तालुक्यातील सर्व पीडित शेतकरी व नागरिकांना घेऊन १८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता महावितरण कार्यालय, जेऊर येथे भव्य धरणे आंदोलन पुकारले आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडताना शंभूराजे जगताप म्हणाले की, “करमाळा तालुक्यातील विजेचा प्रश्न आता केवळ तांत्रिक बिघाडापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो थेट शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. ऐन पिकांच्या वाढीच्या काळात शेतीपंपांची वीज खंडित करून महावितरण शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. हक्काच्या विजेसाठी शेतकऱ्यांना अक्षरशः भीक मागावी लागते, ही अत्यंत संतापजनक आणि लाजीरवाणी बाब आहे.”
गावागावांतील सिंगल फेज वीजपुरवठा तासनतास खंडित राहत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. रात्रीच्या वेळी वीज नसल्यामुळे देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. परीक्षांच्या तोंडावर मुलांना अंधारात बसावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजना, दळणवळण आणि दैनंदिन घरगुती कामे विजेअभावी पूर्णपणे ठप्प झाली असून महिला व वृद्धांचे हाल होत आहेत. शेतीपंपांना नियमित दाबाने वीज न मिळाल्याने हातातोंडाशी आलेली पिके वाळू लागली आहेत.
’एक शेतकरी म्हणून मी मैदानात उतरलोय’
“मी केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक म्हणून नव्हे, तर एका शेतकऱ्याचा मुलगा आणि स्वतः शेतकरी असल्याच्या नात्याने या वेदना जवळून पाहत आहे. जर आपण आज आवाज उठवला नाही, तर महावितरणचा हा मनमानी कारभार तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण व्यवस्था उद्ध्वस्त करेल. त्यामुळे पक्ष, गट आणि तट बाजूला ठेवून आपल्या हक्कासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे,” असे भावनिक आवाहन शंभूराजे जगताप यांनी केले.
तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव, विद्यार्थी, युवक आणि अन्यायग्रस्त नागरिकांनी १८ सप्टेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता जेऊर येथील महावितरण कार्यालयासमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहून या लढ्यात आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.