
करमाळा प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सदरील कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. अंकुश करपे यांनी केली. तर प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने सर यांनी विद्यार्थ्यांना रक्षा बंधन कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी शिक्षकांना व विद्यार्थ्यांना राखी बांधून बंधुभाव, परस्पर स्नेह आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून भारतीय संस्कृतीतील भाऊ-बहिणीच्या प्रेमाच्या नात्याबरोबरच परस्पर आदर, विश्वास, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थिनींनी विविध रंगांच्या आकर्षक राख्या बांधून विद्यार्थ्यांचे औक्षण केले. यावेळी विद्यार्थ्यांनीही बहिणींच्या संरक्षणाची व सन्मानाची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालय परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिमन्यु माने, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुधीर मुळीक, डॉ. अंकुश करपे तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.