
करमाळा प्रतिनिधी
जिल्हाधिकारी यांनी उजनी धरण काठावरील शेतीपंपांना दररोज चार तास अखंड वीजपुरवठा करण्याचे आदेश दिले असतानाही जेऊर सेक्शनकडून या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याची गंभीर तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

परिसरातील अनेक गावांमध्ये शेतीपंपांना नियमानुसार चार तास सलग वीज मिळत नसल्याने पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही. त्यामुळे ऊस, डाळिंब, केळी तसेच इतर पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश असतानाही संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शासनाच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून जेऊर सेक्शनमार्फत चार तास अखंड वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत त्वरित कार्यवाही न झाल्यास शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भिवरवाडीचे उपसरपंच डॉ.भाऊसाहेब शेळके यांनी दिला आहे
