करमाळा प्रतिनिधी

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय लक्षात घेता एप्रिल व मे महिन्यात प्रत्येक विद्यालयात विशेष कॅम्प आयोजित करावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी माढा विभागाच्या उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दरवर्षी जून महिन्यात शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू होत असताना विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला यांसारख्या विविध कागदपत्रांची आवश्यकता भासते. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना हे दाखले मिळवण्यासाठी तहसील व इतर शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मौल्यवान वेळ वाया जातो, तसेच पालकांवर आर्थिक व मानसिक ताण वाढतो.

त्यामुळे प्रत्येक विद्यालयात शासकीय दाखल्यांचे कॅम्प आयोजित करून शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे गोळा करावीत व त्याच ठिकाणी दाखले उपलब्ध करून द्यावेत, अशी लोकाभिमुख मागणी गणेश चिवटे यांनी केली आहे.

यावेळी बोलताना गणेश चिवटे म्हणाले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालकांना छोट्या कामासाठी ही तालुक्याच्या ठिकाणी वारंवार जावे लागते. शासनाच्या सुविधा गावपातळीवर पोहोचणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक विद्यालयातुन दाखले देण्याची व्यवस्था केल्यास विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल असे सांगितले.

दरम्यान उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *